। माणगाव । वार्ताहर |
पावसाळी दिवसात तयार होणारी, खायाला रुचकर व चवदार असणारी, खवय्यांची खास पसंती असलेली, माणगाव तालुक्यात पिकणारी काकडी बाजारात विक्रीसाठी आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर काकडी बहरू लागली असून घाऊक व किरकोळ विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. डोंगर उतारावर मांडव घालून शेतकरी काकडीची लागवड करतात. पावसाळ्याच्या दिवसात दुसरे कोणतेच फळ पीक घेता येत नसल्याने शेतकरी काकडीचे उत्पादन घेतात.
या दिवसात काकडीलाही चांगली मागणी असते. नामदेव, उमाजी, पद्मिनी, झेनिया इत्यादी बियाणे लागवड करून मोठ्या प्रमाणावर काकडीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. गेल्या महिन्यापासून पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे काकडीच्या वेली तरारून आल्या आहेत. माणगावातील काकडी पनवेल, महाड, पेण या बाजारात विक्रीसाठी जातात.उत्पादन कमी असल्याने 40 ते 50 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे. तर घाऊक विक्रीसाठी 25 ते 30 रुपयांचा दर आहे.आता सुरुवात झाली आहे. गोकुळाष्टमी, गणपतीपर्यंत काकडीला चांगला बाजारभाव मिळेल. – रामदास जाधव, काकडी उत्पादक, विक्रेता माणगाव