गेल्या आठवड्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे शिबिर कर्जतमध्ये झाले. मध्यंतरी अजितदादा डेंग्यूने आजारी होते. अर्थात, त्याच काळात ते एकदा दिल्लीला जाऊन अमित शाह यांना भेटून आले ही गोष्ट वेगळी. पण हा आजार राजकीय नव्हता असे दादांनीच सांगितलेले असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. कर्जतच्या शिबिरात दादांनी पुन्हा एकवार काका शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला. यापूर्वी वांद्य्रात झालेल्या पहिल्या जाहीर सभेत दादांनी पहिली खुली टीका केली होती. वय झालं, घरी बसा असा सल्ला त्यांनी काकांना दिला होता. शिवाय भाजपशी युती करायला काकाच कसे उत्सुक होते याची काही उदाहरणे दिली होती. त्यानंतर शरद पवारांनी राज्यभर दौरे करून त्याला प्रत्युत्तर देऊ असे जाहीर केले होते. छगन भुजबळ यांच्या नाशिक व धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये तशा सभा झाल्यादेखील. पण नंतर दोन्ही बाजूंची एकमेकांवरची टीका जुजबी स्वरुपाची राहिली. कर्जतमध्ये मात्र पुन्हा एकवार प्रफुल्ल पटेल आणि अजितदादांनी शरद पवार यांची नेम धरून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. पवार हे भाजपसोबत जाण्यासाठी खूप पूर्वीपासून उत्सुक होते व तसे प्रयत्न गेल्या सुमारे वीस वर्षांपासून अनेकदा झाले आहेत हे या दोघांच्या बोलण्याचे मुख्य सूत्र आहे. 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात असताना शरद पवार, भाजप व शिवसेना यांनी एकत्र निवडणुका लढवाव्यात असा एक प्रस्ताव तयार झाला होता. पण शेवटच्या क्षणी पवारांनी माघार घेतली असा आरोप पटेल यांनी केला. पटेल यांनी सांगितलेली गोष्ट आपल्यालाही ठाऊक नव्हती असे अजितदादा म्हणाले. खरे म्हणजे त्या काळात प्रफुल्ल पटेल हेच भाजपमध्ये जायला उत्सुक होते असे दिवंगत प्रमोद महाजन यांनी अनेक पत्रकारांना तेव्हा सांगितले होते. आता त्याविषयी कोणी बोलत नाही हे आश्चर्यकारक आहे. असो.
मतदारांना का घाबरता?
शरद पवारांनी अलिकडे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नंतर तो मागे घेण्याचा केलेला प्रकार म्हणजे मोठा बनाव होता असे अजितदादांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार भाजपमध्ये जावे अशा मताचे होते. पण पवारांना ते सांगण्याचे त्यांचे धाडस होत नव्हते. अखेर तुम्ही तुम्हाला हवा तो निर्णय घ्या, मी राजीनामा देतो असे शरद पवारांनी सांगितले. तो मागे घेण्यासाठी चव्हाण प्रतिष्ठानसमोर कार्यकर्त्यांनी धरणे धरले. पण हा सर्व काकांनीच उभा केलेला देखावा होता असे दादांचे म्हणणे आहे. पटेल आणि दादा हे पवारांची प्रतिमा भंजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे उघड आहे. भारतीय जनता पक्षाची त्यांच्याकडून ही प्राथमिक अपेक्षा आहे. ती पूर्ण करणे दादांना भाग आहे. कदाचित मधल्या काळात दादांच्या टीकेचा स्वर कमी झाला होता त्याची जाणीव त्यांना अमितभाईंनी दिल्लीत करून दिली असावी. ते काहीही असो, पण पवारांना बदनाम केल्याखेरीज दादांच्या भाजपसोबत जाण्याच्या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही ही यातली सर्वात ठळक वस्तुस्थिती आहे. दादा किंवा पटेल हे खरे तर आता सत्तेत आहेत. भाजपचे विचार जुळतात म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आलो एवढेच ते म्हणून शकतात. सत्तेत आल्यामुळे विकासाला अमुक प्रकारे गती मिळाली हे दाखवून देऊ शकतात. पण आपल्या मतदाराला शरद पवारांच्या प्रभावापासून कसे तोडणार हा त्यांच्यापुढचा मोठा पेच आहे. त्यामुळेच ते पुन्हा पुन्हा त्यांच्यावर घसरत आहेत. अजितदादांना विकास या गोष्टीचे फार प्रेम आहे. सामान्य मतदार विचारसरणीपेक्षा विकास या गोष्टीकडे आकर्षित होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे लोकांनी अगदी सहजपणे दादांकडे जायला पाहिजे. पण अजितदादांच्या गटालाच याचाच भरवसा वाटत नाही. कारण, मुळात विकासासाठी नव्हे तर इडी इत्यादींच्या चौकशीतून बचावण्यासाठीच दादा गटातील अनेक लोक तिकडे गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे.
दिल्या घरी सुखी राहा
दादा आणि पटेल यांच्या आरोपांमधील पोकळपणा आणखी एका मुद्द्यावर उघडा पडतो. शरद पवार हे भाजपसोबत जाण्यासाठी वेळोवेळी तयारी करीत होते हा आरोप समजा खरा आहे असे गृहित धरला तरी पवार हे अनेकदा संधी असूनही प्रत्यक्षात कधीही भाजपसोबत गेलेले नाहीत हे ढळढळीत सत्य आहे. निदान आजपर्यंत तरी पवारांनी भाजपला पाठिंब्याची स्पष्ट कृती केलेली नाही. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांना सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी न मागता बाहेरून पाठिंबा दिला हे खरे. पण त्या बदल्यात त्यांनी एखादे पद किंवा तत्सम लाभ सरकारकडून मिळवला नव्हता. शिवाय, नंतर शिवसेना थोड्याच दिवसात सरकारात सामील झाल्याने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची भाजपला गरज उरली नाही. पवारांना 2014 सारखीच संधी पुन्हा 2019 मध्येही होती. पण तेव्हा ते भाजपला पाठिंबा न देता महाविकास आघाडीत सामील झाले. अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीला पाठिंबा असता तर त्यांना परत बोलावण्याची कृती त्यांनी केली नसती. राजीनामा प्रकरणाच्या बाबतीतही तेच आहे. राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांना भाजपसोबत जायचे आहे असे दिसल्यामुळे त्यांनी स्वतः राजीनामा देण्याची भूमिका घेतली. म्हणजे ते या कृतीचा भाग होऊ इच्छित नव्हते. राजीनामा मागे घेण्याची कृती हे नाटक होते असे गृहित धरले तरीही बाहेर पडू इच्छिणाऱ्या आमदारांना शरद पवारांच्या विरोधात तेव्हा एकजूट दाखवता आली नव्हती हे वास्तव शिल्लक राहते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अजितदादांवरचा दबाव वाढवला व त्यांना पक्ष फोडण्यास भाग पाडले असाही याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ, मोदींचे भोपाळचे भाषण आठवून पाहा. बहुसंख्य आमदार जर इतके विकास यात्रा-वादी होते तर त्यांची संख्या आजही खुलेपणाने का सांगितली जात नाही हाही प्रश्न आहे. सारांश असा की, दादांनी आता नवीन घरोबा केला आहे तर त्यांनी तेथे सुखात राहावे. आपल्याला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी अजूनही त्यांना काकांवर टीका करावी हे त्यांना शोभणारे नाही.
दादा, सोडा की आता
