Raigad Politics: दळवींचा स्वतंत्र डाव; गोगावलेंवर घाव?

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

कोकणातील एकमेव विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेवरून महायुतीत अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. एकीकडे शिवसेना ही जागा स्वतःकडे ठेवण्यावर ठाम असल्याचे बोलले जात असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही या जागेवर दावा कायम असल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आ. महेंद्र दळवी यांनी कन्या जुईली दळवी (जुईकर) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत गोगावलेंविरोधातच राजकीय संदेश दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. रत्नागिरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची हालचाल सुरू झाल्याने महायुतीतून अधिकृत उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, एकाच पक्षात असूनही ज्येष्ठ नेते गोगावले यांच्या भूमिकेला न जुमानता दळवींनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्षांतर्गत शेवटच्या क्षणी काही उलटफेर होऊ नयेत, यासाठीच ‘सेफ गेम’ म्हणून कन्येला मैदानात उतरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कोकणातील उमेदवारीवरून वाढली रस्सीखेच
दरम्यान, विकास गोगावले यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री पद, स्थानिक समीकरणे आणि महायुतीतील अंतर्गत समझोत्यांच्या चर्चांमुळे कोकणातील ही जागा अधिकच चर्चेत आली आहे. त्यामुळे महायुतीत खरी लढाई विरोधकांशी आहे की घरातच सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Exit mobile version