एका महाराणीचा मृत्यू

मधुरा कुलकर्णी

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाच्या वार्तेने सर्वांना धक्का बसला. जगाच्या इतिहासावर सात दशकं आपल्या अस्तित्वाची मोहोर उमटवणारी दुसरी कोणतीही व्यक्ती आज हयात नाही. ब्रिटीश जनतेच्या अनेक पिढ्यांना राणीच्या असण्याची इतका दीर्घकाळ सवय होती की राणी मर्त्य आहे हे स्वीकारणं त्यांना जड जात आहे. या काळात चर्चिलपासून लिझ ट्रसपर्यंत 15 ब्रिटीश पंतप्रधानांना तिने शपथ दिली आणि 30 अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पाहिले. 

सर्वाधिक काळ राणीपदावर बसण्याचा मान मिळवलेल्या क्वीन एलिझाबेथ द सेकंड यांचं वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वार्तेने सर्वांना धक्का बसला. जगाच्या इतिहासावर सात दशकं आपल्या अस्तित्वाची मोहोर उमटवणारी दुसरी कोणतीही व्यक्ती आज हयात नाही. ब्रिटीश जनतेच्या अनेक पिढ्यांना राणीच्या असण्याची इतका दीर्घकाळ सवय होती की राणी मर्त्य आहे हे स्वीकारणं त्यांना जड जात आहे. या काळात चर्चिलपासून लिझ ट्रसपर्यंत 15 ब्रिटीश पंतप्रधानांना तिने शपथ दिली आणि 30 अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पाहिले. राणी म्हणून 100 देशांचा प्रवास करत मानसन्मान मिळवला. लहानपणी लिलीबेट या नावाने ओळखल्या जाणार्‍या राणीची ही गोष्ट ती दहा वर्षांची असताना 1936 मध्ये सुरू झाली. तोपर्यंत तिला विशेष महत्त्व नव्हतं. बाल्टीमोर मधल्या घटस्फोटितेबरोबर लग्न करायचा निर्णय ब्रिटनचे सम्राट असलेल्या तिच्या काकानं जाहीर केल्यानंतर त्यांना पदच्युत व्हाव लागलं अन एलिझाबेथचे वडील इंग्लंडचे राजे बनले.
एलिझबेथला राणीपदासाठी निवडलंगेलं ते तिच्या इच्छेविरुद्धच. दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा लिलीबेट 13 वर्षाची होती अन युद्धाचे काटकसरीचे चटके तिनेही भोगले. त्याच वेळी ती ग्रीसच्या डच वंशीय रुबाबदार, देखण्या राजपुत्राच्या प्रेमात पडली अन् पुढे त्यांचं लग्न झालं. प्रिन्स फिलीप हे देखणे होते अन रंगेलही. त्यांच वर्णन ‘ब्लाँड व्हायकिंग’ असं केलं गेलं. पतीशी जेवढे प्रेमाचे क्षण तेवढेच संघर्षाचेही. अर्थात तिने हे सर्व पेललं एक राणी म्हणून. 1950 च्या काळात दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या ब्रिटीश जनतेला एक ग्लॅमरस कपल हवं होतं. ती गरज या दांपत्यानं पूर्ण केली. 1952 मध्ये आफ्रिकेच्या दौर्‍यावर असताना अनपेक्षितपणे वडिलांच्या निधनाची बातमी समजली अन एका क्षणात लिलीबेटची महाराणी झाली. त्याच काळात ब्रिटनमध्ये टेलिव्हीजनच युग सुरू झालं होतं. तिचा राज्याभिषेक लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आला. हे या आधी घडलं नव्हतं. पुराणमतवाद्यांचा, चर्चचा विरोध होता. पण तिने आणि तिच्या नवर्‍याने राणीपदाच्या चौकटीत राहून तो मोडून काढला. वडील गेल्यावर पहिल्या भाषणातच तिने आपल्यातल्या कठोर व्यक्तिमत्त्व आणि समर्पित वृत्तीची चुणूक दाखवली. ‘आजपासून अखेरच्या श्‍वासापर्यंत माझं आयुष्य इंग्लंडच्या जनतेला आणि राजघराण्याला समर्पित करत आहे,’ हे वचन तिने अखेरपर्यंत पाळलं.तिने अनेकदा पुराणमतवाद्यांशी, चर्चशी संघर्ष करत परंपराभीमानी असणार्‍या ब्रिटीश जनतेला आधुनिकतेच्या वळणावर नेलं. पारंपारिकतेची कास न सोडता. चौकटीत राहून, आधुनिक मर्यादा पाळून, भान राखून जिद्दी आणि लाघवी अशी ती आयुष्यभर वागली. राणी एलिझाबेथने मर्यादेत राहून, चौकट पाळून या पदाचा मोठेपणा जपला.
राणी झाल्यानंतरच्या काळात राजघराण्याचं साम्राज्य लयाला गेलं. परंतु साम्राज्य ते कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकूल असा प्रवास तिने कौशल्याने केला. 56 देशांचं संघटन तिने चतुराईने साधलं. गुणांनी तिच्या कित्येक पटींनी वरचढ असलेल्या अनेक नेत्यांशी तिने आत्मविश्‍वासाच्या बळावर उत्तम संबंध ठेवले. त्यामुळे इतकी दशकं ती ब्रिटनच्या जनतेच्या आदराला पात्र झाली. परंतू तिचं वैयक्तिक आयुष्य वादळी होतं. एकीकडे पती फिलीपचं रंगेल आयुष्य. अर्थात सामंजस्याच्या बळावर तिने पतीलाही वठणीवर आणलं. पण याच काळात एका कोमल राजकन्येचं रुपांतर पोलादी हृदयाच्या आणि चेहर्‍याच्या राणीत कधी झालं ते तिलाच कळलं नाही. नियतीने दिलेलं राणीपद राखण्यासाठी तिने अपार कष्ट केले आणि अनेक क्षणी कुटुंबापेक्षा राजघराण्याला औक्षण करण्यात धन्यता मानली. सुमार सामान्यज्ञान असतानाही विलक्षण कॉमनसेन्सच्या आधारे तिने अचंबित करणारे निर्णय घेतले.

1992 हे वर्ष राणीासाठी महाभयंकर होतं. आधी चार्ल्स-डायनाचा घटस्फोट झाला. प्रिन्स ऍन्ड्रयु आणि राजकन्या अ‍ॅन यांच्या आयुष्यातल्या वैयक्तिक वादळांनी राजघराण्याला हादरे बसले. उलटसुलट मतप्रवाह आले. प्रचंड टीकेचं धनी व्हावं लागलं आणि अनेक शतकं जपलेल्या विंडसर कॅसल या घराला प्रचंड मोठी आग लागली. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेली राणी अधिक निशब्द, अधिक रिझर्व्ह बनली. आयुष्यात कोणत्याही प्रसंगी मनातल्या भावनांनी तिच्या वक्तव्यावर मात केल्याचं दिसलं नाही. कुठेही भावनातिरेक नाही, वाहून जाणं नाही. सगळं मोजून मापून, क्षणाक्षणाला महाराणी असल्याची जाणीव करून देणारं. पुढे राजपूत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांनी राजघराण्याचा त्याग केला. डायनाने जी कारणं दिली, तीच त्यांनीही दिली. राजवाड्यातली भावनाशून्य वागणूक वगैरे. त्यावर तिने चकार शब्द काढला नाही. अर्थातच आता पुढे काय, राजगादीचा वारस कोण, त्याच्यासमोरची आव्हानं काय? ज्येष्ठ पूत्र म्हणून प्रिन्स चार्ल्स आता समारंभपूर्वक इंग्लंडचे राजे बनतील. पूर्व इतिहास आणि कमजोर व्यक्तिमत्त्व पाहता त्यांना क्वीनची लोकप्रियता लाभणार नाही, हे उघड आहे. मग घटनात्मक राजेशाही कायम राहणार का? हे प्रश्‍नचिन्ह ठेऊन राणी गेली.
एकविसाव्या शतकात जगाच्या नकाशात, व्यवस्थेत प्रचंड बदल घडले आहेत. त्यात अचल होती ती क्वीन एलिझाबेथ. म्हणूनच ती ब्रिटनच्या अस्तित्वाचं, अस्मितेचं प्रतीक होती. ज्या बालमोरल इथल्या राजवाड्यात तिने आपलं बालपण घालवलं तिथूनच तिचं पार्थिव अंतिम प्रवासासाठी निघालं. काय सांगतो हा जीवनप्रवास? आदर राखून कर्तव्य कसं पार पाडावं, आब राखून लोकांना आपलंसं कसं करावं… भावनेचं प्रदर्शन न करताही त्यांच्या कौतुकास पात्र कसं व्हावं या गुणांचा हा प्रवास. परंपरेचा, नवतेचा आणि सातत्याचा प्रवास… तिची कित्येक भाषणं ऐकायला मिळाली. विशेषतः कोरोनाकाळात संपूर्ण जग विस्कळीत झालेलं असताना ब्रिटीश जनतेला धैर्य देण्यासाठी तिने उच्चारलेले शब्द आज आठवताहेत. ती म्हणाली होती, ‘वुई वील मीट अगेन’. अशी राणी आमच्या आयुष्यात पुन्हा होईल की नाही याविषयी शंका आहे. आपल्या कारकिर्दीला 70 वर्षं पूर्ण केली तेव्हा तिने ब्रिटीश जनतेला एक पत्र लिहिलं होतं. त्याखाली सही होती, तुमची सेवक एलिझाबेथ द सेकंड… नागरिकांना दर्शन देण्यासाठी बंकिंगहम पॅलेसच्या त्या गॅलरीत ती आता दिसणार नाही कारण राजघराण्याने आपला आत्मा गमावला आहे.   

Exit mobile version