। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन व हरिहरेश्वर समुद्र किनार्याला निसर्ग चक्रीवादळाने झोडपून काढले होते. चक्रीवादळामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील फळझाडे नष्ट झाली आहेत. नारळ, सुपारी, आंबा,फणस,काजू,कोकम यांची झाडे उभी आहेत ती सुद्धा घाबरलेली असल्याने, त्यांची फलोत्पादन क्षमता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बागायतदारांनी झाडांची नवीन लागवड केलेली असली तरीही अजून झाडे उत्पादन देण्यासाठी सात ते आठ वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वादळानंतर उध्वस्त झालेला बागायतदार पुन्हा उभा राहण्यासाठी कमीत कमी दहा वर्षाचा कालावधी लागेल.
चक्रीवादळा नंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी, शेतकर्यांना झाडांच्या नुकसानीची जी मदत मिळाली आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे. मागील वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी देखील श्रीवर्धन बाजारपेठेत एकही फणस विकायला आलेला पाहायला मिळाला नाही. त्याचप्रमाणे वादळात कोकमाची झाडे नष्ट झाल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मिळणारे कोकम सरबत, कोकम आगळ, त्याचप्रमाणे आमसुले याचे उत्पादन कमी झाले. निसर्ग चक्रीवादळा नंतर नारळ किंवा सुपारी किंवा फणस यांची झाडे उत्पादन देण्यासाठी खूप वेळ लागेल म्हणून शेतकर्यांनी तातडीने पीक देणार्या केळ्यांच्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. परंतु मागील वर्षी मे महिन्याच्या 16 व 17 तारखेला आलेल्या तोक्तेे चक्रीवादळामुळे लावलेली केळीची झाडे देखील पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. निसर्ग चक्रीवादळामध्ये सर्वात जास्त नुकसान हरिहरेश्वर परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाले. त्यातच दोन वर्ष कोरोना महामारी मुळे फुकट गेल्यामुळे बागायतदार पूर्णपणे आर्थिक विवंचनेत सापडलेला पाहायला मिळत आहे.