सलग दुसर्या वर्षी व्यावसायिक तोट्यात
। चौल । वार्ताहर ।
लहरी हवामानाचा फटका आंबा उत्पादनाला बसला असून, सलग दुसर्या वर्षी धंदा तोट्यात आहे. वीस-पंचवीस वर्षांपासून आंबा खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असून, मागील दोन वर्षे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आम्हा व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील आंबा व्यावसायिक सुनील गणपत घरत यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.
आंबा पिकाला अवकाळीचा फटका बसतोच. मात्र, यंदा अवकाळीनंतर आंबा उन्हात होरपळणार असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीला उष्णतेची लाट सतावत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने फळगळ व फळ फुटण्याचे प्रमाणात वाढ होत आहे. सततच्या हवामानाच्या लहरीपणाचा फटका आंबा बागायतदारांना बसत आहे, ही बाब खरी असली तरी, नुकसान जास्त होते ते बागायतदारांचे. कारण, आज हातावर मोजता येतील एवढेच आंबा बागायदार शेतकरी आंबा विक्रीचा व्यवसाय करतात. बहुतांश शेतकरी आपली बाग व्यावसायिकांना (व्यापार्यांना) इच्छित किंमत देऊन मोकळे होतात. त्यामुळे ठरलेली किंमत ही त्या शेतकर्याला देणे व्यावसायिकांना बंधनकारक ठरते. मग फायदा होवो अथवा तोटा! शिवाय, निसर्गाच्या लहरीपणाचा फायदा नुकसानग्रस्त शेतकर्यांनाच मिळतो, व्यावसायिकांना नाही, हे कुणाच्याही अद्याप लक्षात येत नाही. कारण, पंचनामे करुन शेतकर्यांना शासनाकडून भरपाई मिळते. व्यापार्यांच्या हाती मात्र भोपळा येतो. त्यामुळे व्यापार्यांचादेखील यापुढे विचार व्हावा, असे सुनील घरत यांनी मत व्यक्त केले.
यावर्षी लांबलल्या पावसामुळे 70 टक्के कमलांना मोहोर येण्याऐवजी पालवी आली. त्यामुळे 10 टक्के हापूस आंब्याच्या कलमांना मोहोर आला. तसेच यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये म्हणावी तशी थंडी पडली नाही. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्यास वातावरण अनुकूल नव्हते. दुसर्या टप्प्यातील मोहोर डिसेंबरमध्ये येतो आणि तिसर्या-चौथ्या टप्प्यातील जानेवारी-फेबु्रवारी महिन्यात येतो. यावर्षी सर्व प्रक्रिया लांबणीवर पडल्याने एक महिना उशिरा पीक आले. पहिल्या टप्प्यात 10 टक्केच आंबा उत्पादन झाले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची प्रखर लाट जाणवत असून, 30 ते 35 डिग्री सेल्सियसच्या वर तापमान वाढले आहे. त्यामुळे मोहोर करपून गेला आहे. त्याचा फटका आंबा पिकाला बसला असून, उत्पादनात घट होईल.
साधारणतः फेब्रुवारी महिन्यात हापूस मार्केटमध्ये गेला तर त्याला प्रतिडझन 800 ते 100 रुपये दर मिळतो. तर पाच डझनच्या हापूस पेटीला तीन ते साडेतीन हजार रुपये वाशी मार्केटमध्ये मिळतात. मात्र, उत्पादन कमी असल्याने खर्चही भागणार नाही. अशी स्थिती आहे. तसेच निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे आंबा पीक टिकविणे आणि त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळविणे ही फार मोठी समस्या आंबा व्यापार्यांसमोर निर्माण झाली आहे. आणि, ती कायमचीच आहे.
खर्च अन् उत्पन्नाचा ताळमेळ बसेना!
आतापर्यंत जवळपास दहा लाख रुपये खर्च करुन आंब्याच्या बागांची खरेदी केली आहे. सप्टेंबरच्या आसपास आंब्याच्या झाडांचे परीक्षण करुन त्या बागा शेतकर्यांकडून खरेदी केल्या जातात. त्यावेळी झाडांवर मोहोराचा पत्ताही नसतो. फळधारणा होईपर्यंत कीटकनाशके व तुडतुडे नाशकांच्या फवारण्या कराव्याच लागतात. दरवर्षी शेणखताबरोबरच महागडी खते द्यावीच लागतात. पाच ते सहा वेळा फवारण्या करण्यात आल्या असून, त्याचा खर्च साडेतीन लाखांच्या आसपास आहे. मजुरांचा खर्च वेगळाच. हापूस आंब्याच्या उत्पादनाचा खर्च अमाप आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने खर्चही भागणार नाही, अशी स्थिती आहे. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे आंबा पीक टिकविणे आणि त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळविणे ही फार मोठी समस्या आंबा व्यापार्यांसमोर निर्माण झाली आहे. आणि, ती कायमचीच आहे.
शेतकरी आणि व्यावसायिक यांच्यात झालेल्या करारानुसार व्यावसायिकाला कोणत्याही परिस्थितीत शेतकर्याला बागायतीची ठरलेली रक्कम देणे बंधनकारक असते. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे बागायतींचे ज्यावेळी नुकसान होते, तेव्हा त्याची भरपाई व्यापार्यांना नाही, तर शेतकर्यांना मिळते. त्यामुळे शेतकर्याचे नुकसान भरुन निघते. व्यावसायिक मात्र नुकसानीच्या खाईत लोटला जातोय, याचाही विचार व्हावा.
- सुनील घरत, व्यावसायिक, चौलमळा







