रो-रो सेवेची प्रवाशांना प्रतीक्षाच
| उरण | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील रेवस बंदराच्या जेट्टीच्या कामाच्या दिरंगाईमुळे उरणच्या करंजा ते अलिबाग मधील रेवस बंदराच्या दरम्यानची रो-रो जलसेवा सुरू झालेली नाही. या रखडलेल्या आणि संथगतीने होणाऱ्या कामाला जबाबदार कोण, असा सवाल या मार्गावरील संतप्त प्रवाशांनी केला आहे.
उरण ते अलिबाग या सागरी मार्गावरील उरण मधील करंजा ते अलिबागच्या रेवस या दोन बंदरा दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यासाठी सात वर्षांपूर्वीच करंजा जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या मार्गाला जोडणाऱ्या अलिबाग मधील रेवस जेट्टीचे काम रखडल्याने ही सेवा सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी दोन्ही तालुक्यातील प्रवासी व नागरिकांकडून केली जात आहे.
उरण व अलिबाग या दोन तालुक्यादरम्यान दोन किलोमीटरचे सागरी अंतर असून अनेक वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करण्यासाठी छोटया बोटीचा (तरीचा) वापर केला जात आहे. ही सेवा अपुरी असल्याने या सागरी मार्गावर रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने तयार करून कामाला सुरुवात केली. त्यानुसार 25 कोटी रुपये खर्च करून उरणच्या करंजा बंदरात रो-रोची स्वतंत्र जेट्टी तसेच तिकीट घर, कार्यालय व वाहनतळ आदींची उभारणी करण्यात आली आहे. मात्र अलिबाग मधील रेवस जेट्टीचे काम अपूर्ण असल्याने ही सेवा रखडली आहे. रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याची माहिती मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उरण व अलिबागमधील अंतर कमी होणार या रो-रो सेवेमुळे उरण व अलिबागच्या प्रवाशी व नागरिकांना आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील 50 किलोमीटर पेक्षा अधिकचे रस्ते मार्गातील अंतर कमी होणार आहे. उरण ते अलिबाग दरम्यानच्या जलद आणि वाहनासह प्रवास करण्यासाठी प्रस्तावित रो-रो सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी उरण मधील निवृत्ती कर्मचारी अशोक म्हात्रे यांनी केली आहे.
प्रवासी संख्या वाढली उरण मधील वाढते उद्योग आणि नवी मुंबईच्या जवळ असणारे शहर म्हणून नोकरी, व्यवसाय व शिक्षण यानिमित्ताने उरण ते अलिबाग दरम्यान प्रवास करणाऱ्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेवस जेट्टीवर वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे.