दिवसभर ढगाळ वातावरण
अंबा बागायतदार, शेतकरी चिंतेत
। मुरुड । वार्ताहर ।
काल दिवसभर मुरुड तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. संपुर्ण मुरुड तालुक्यावर अवकाळी पावसाचे सावट पसरले आहे. या ढगाळ वातावरणामुळे मात्र अंबा बागायतदार व शेतकरी मोठ्या चिंतेत पडले आहेत. सन २०२० पासुन आलेल्या कोरोना संकटातून सुटका होते न होते तोच अवकाळी पाऊस, येणारे चक्रीवादळ, ढगफुटी या सर्वातून विस्कळीत झालेले जनजीवन आता कुठे सावरुलागले होते. तर प्रत्येक महिन्याला अवकाळी पाऊस येवू लागले असल्याने बागायतदार, शेतकरी अधिक चिंतेत पडले आहेत. त्यात सतत या येणाऱ्या अवकाळी पावसामुळे अंब्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. आता हा थोड्या प्रमाणात राहीलेला अंबा जातोय की काय अशी चिंता बागायतदारांना पडली आहे. मुरूड तालुक्यात शेतकरी वर्ग हे छोटे मोठे पीक घेत आले आहेत. चवळी, वांगा, वाल, पावटा, टाॅमॅटो, मिरची, कोथिंबीर, पांढरा कांदा, तूर, पडवळ, घेवडा, काकडी, विवीध पालेभाज्या इ. स्वरुपातील पीक घेत आले आहेत. पण या वारंवार येणाऱ्या अवकाळी पावसामुळे या पिकांवर परिणाम होत आहे व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. वाढती महागाई पाहता वारंवार होणारे नुकसान परवडत नसल्याचे बागायतदार व शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.