विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई

पहाटे पाच वाजले तरी अधिकार्‍यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

। मुंबई । वृत्तसंस्था ।

ठाकरे गटाला ज्या ठिकाणी मतदान जास्त पडतेय त्या ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला जातोय. मतदारांना मुद्दामून ताटकळत ठेवल्याचं दिसतेय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. कितीही वेळ लागला तरी मतदारांनी मतदान करावं, असं आवाहनही त्यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मतदारांना हे आवाहन केलं.

मतदारांमध्ये उत्साह मोठा असून निवडणूक आयोगाकडून मतदान करण्याचे आवाहन केलं जातंय. मात्र अशातच निडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत असून पक्षपातीपणा करत आहे. मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकार्‍यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला मतदानाला जाणून बूजून वेळ केला जातोय, त्यावेळी तुम्ही जवळच्या शिवसेना शाखेला त्याची माहिती द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याचे दिसत असलं तरी मतदान करा. जे मतदार कंटाळून परत गेले आहेत त्यांनी पुन्हा केंद्रावर जाऊन मतदान करावे. ज्या मतदान केंद्रावर आयोगाच्या अधिकार्‍यांकडून वेळकाढूपणाचा अनुभव आला असेल त्या ठिकाणच्या मतदान केंद्र अधिकार्‍यांचं नाव विचारावं, नोंद करावे. अशांची माहिती गोळा करून आम्ही न्यायालयात जाऊ. शेवटचा मतदार हा मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग मतदान थांबवू शकत नाही, त्यामुळे वेळेच्या आधी मतदारांनी मतदान केंद्रात जावं आणि मतदान करावे. मोदी सरकार पराभवाच्या भितीने पछाडलेले आहे. मतदानासाठी गेलेल्या अनेकांची नावे यादीमधून वगळली जाणे हा सरकारचा आवडता खेळ आहे. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचंही समोर आलं आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

Exit mobile version