। माणगाव । प्रतिनिधी ।
दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावरील माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्यागिक क्षेत्रात झपाटयाने वाढ होत असून या महत्वाच्या औद्यगिक वसाहतीत अद्यापही स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती झाली नसल्याने या भागातील सुरक्षितेचा प्रश्न दिवसेंदिवस ऐरणीवर येत आहे. औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होऊन तब्बल 30 वर्षे लोटली या औद्योगिक क्षेत्रात देशी – विदेशी कंपन्यांनी आपले जाळे पसरले असून या औद्योगिकीकरणा बरोबरच नागरीकीकरणही झपाट्याने वष्ट आहे. त्याच बरोबर या भागात अनेक लहान-मोठ्या स्वरूपाचे गुन्हे व अपघातही ताम्हणी घाटात घडत आहेत. या एमआयडीसीत स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती होणे गरजेचे असून गेली अनेक वर्ष या भागातील नागरिक मागणी करीत असताना अद्यापही हे स्वतंत्र पोलीस ठाणेची निर्मिती झाली नसल्याने या भागात गुन्हेगारी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. या स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मिती कधी होणार ? असा सवाल उपस्थित करीत बौद्धधम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष पंकज तांबे यांनी पोलीस मुख्यालयात रायगड अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची सदिच्छा भेट घेतली त्या वेळी त्यांनी या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
सध्या विळे-भागाड येथे औद्यागिक क्षेत्राचे कामे गेल्या पंधरा वर्षापासून झपाटयाने सुरु असून विविध ठिकाणाहून मोठया प्रमाणात कामगार येथे कामानिमित्त आलेले आहेत. त्यामुळे निजामपूर, भागाड, विळे यासह अनेक गावांतील बाजारपेठ गजबजलेल्या दिसतात. येथून जवळच ताम्हाणी घाटातील कोंडेथर गावाजवळील घाटात पावसाळ्यात धबधबे व या मार्गांनी पुणे परिसरातून मोठ्या प्रमाणावर येणारा पर्यटक यामुळे, तसेच घाटातील अपघाताचे वाढते प्रमाण बघितले तर दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, या पोलीस दूरक्षेत्राचा उपयोग नागरिकांना मदतीसाठी किंवा तक्रार देण्यासाठी होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून विळे या गावात किंवा औद्यागिक क्षेत्रात स्वतंत्र पोलीस ठाणे उभारावे, अशी नागरिकांची मागणी गेली अनेक वर्षापासून आहे. मात्र या मागणीचा विचार शासनाने अद्यापही केलेला दिसत नाही. या वेळी अतुल झेंडे यांनी या बाबतचा प्रस्ताव मुख्यालयातून वरिष्ठांना पाठविला असून तो शासन स्तरावर या बाबतची कार्यवाही सुरु आहे. असे सांगितले.