। नवी दिल्ली । वृत्तसस्था ।
झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच कोरोनाची लस निर्मिती करणार्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलीय. पंतप्रधान मोदींनी गुप्ता यांनी एक पत्र लिहिलं आहे. देशातील प्रतिभावान वैज्ञानिकांनी खूप कमी वेळामध्ये फार काम केलं असून स्वदेशी लसींच्या माध्यमातून देशातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्याच्या या कार्यासाठी 15 ऑगस्टनिमित्त या वैज्ञानिकांना सन्मानित करण्यात यावं अशी मागणी गुप्ता यांनी मोदींकडे केलीय.
गुप्ता यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये स्वदेशी लसींची निर्मिती करणार्या वैज्ञानिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना भारतरत्नसारखा मोठा सन्मान देऊन गौरवण्यात यावं असं म्हटलं आहे. जागतिक महासाथीमुळे सर्वसामान्य आयुष्य, व्यापार आणि नियोजनाला मोठा फटका बसलाय. करोनाच्या दोन लाटा भारतात येऊन गेल्या त्यामध्ये अनेकांनी आपल्या नेतावाईकांना आणि जवळच्या व्यक्तीना गमावलं आहे. तिसर्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून संपूर्ण देशासोबत झारखंडही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या अघोषित युद्धामध्ये लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं या पत्रामध्ये गुप्ता यांनी म्हटलं आहे.
खूप कमी वेळामध्ये करोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसींची निर्मिती करण्याच्या कामामध्ये सहभागी असणार्यांचे पंतप्रधान मोदींनी देशाच्या वतीने जाहीर आभार मानले पाहिजेत, अशी इच्छाही गुप्ता यांनी व्यक्त केलीय. कोरोना लसीच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान देणार्या या देशभक्त वैज्ञानिकांना स्वातंत्रदिनी भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावं. पंतप्रधान मोदींनी असं केल्यास या वैज्ञानिकांकडे देशातील युवा पिढी आदर्श म्हणून पाहतील, असंही गुप्ता म्हणालेत.