। तळा । वार्ताहर ।
कृषी विभागामार्फत शेतकर्यांना शेती व्यवसायात सक्रिय होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाला खर्या अर्थाने संजिवनी मिळाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शहराकडे धाव न घेता भाजीपाला शेती, शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय करुन आर्थिक स्त्रोत निर्माण करीत आहेत. मात्र, या शेतकर्यांना बाजारपेठेत विक्रीसाठी जागा नसल्याने घरोघरी किंवा कोणाच्या तरी ओसरीचा पागाणीचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे या कृषीप्रधान देशात कृषी विभागाने भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना बाजारपेठेत माल विक्रीसाठी एका छताखाली कृषी विभाग भाजीपाला उत्पादक विक्री केंद्र स्थापन करावे. जेणेकरून एकाच छताखाली सेंद्रिय खतांसह गावठी तसेच सर्व प्रकारचा भाजीपाला जनतेला मिळू शकेल, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.