| उरण । वार्ताहर ।
तालुक्यात पुन्हा एकदा महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. खोपटे गावात उशिरा मिळणार्या वीज बीलाच्या घटनेवरून महावितरणाचा भोंगळ कारभार सर्वासमोर आला आहे. खोपटे ग्रामपंचायत हद्दीत (खोपटे गावात) ग्रामस्थांना कधीच वेळेत वीजेचे बील मिळत नाही. वीजेची बील भरायची तारीख संपल्यानंतर वीजेचे बील मिळत असल्याने ग्रामस्थांना अधिक पैसे देऊन दंड भरावा लागत आहे. वारंवार होणार्या या महावितरणाच्या कारभाराला खोपटे ग्रामस्थ वैतागले असून जर वेळेत वीज बील मिळाले नाही तर यानंतर वीजेचे बील भरणार नाही. तसेच बील भरले नाही म्हणून जर कोणी महावितरणचे अधिकारी कर्मचारी वीज कट करायला आले, विजेचे कनेक्शन बंद करायला आले तर ते सुद्धा करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका खोपटे ग्रामस्थांनी घेतली आहे.
त्या अनुषंगाने निलेश भगत, अलंकार पाटील, कुमार ठाकूर, महेंद्र पाटील, लक्ष्मण घरत, यशवंत ठाकूर, राजेंद्र म्हात्रे, संतोष पाटील, प्रमोद ठाकूर, महेंद्र पाटील आदी पदाधिकार्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय सोनवले व नायब तहसीलदार नरेश पेढवी यांची भेट घेतली. वीजेचे बील वेळेत मिळावे अशी मागणी केली.