। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत आणि दहिवली या दोन विभागांना जोडणार्या उल्हास नदीवरील श्रीराम पुलाच्या कठड्यावर झाडे उगवली आहेत. ती झाडे पावसाळा सुरु होण्यापूर्वी काढून टाकण्यात यावीत, अशी मागणी करणारे निवेदन दहिवली गाव परिसर विचारमंच यांनी केले आहे.
उल्हास नदीवरील श्रीराम पुलाच्या कठड्यावर झाडे उगवलेली आहेत. ही झाडे सिमेंट बांधकाम असलेल्या वास्तूंचे आयुष्मान कमी करतात. त्यामुळे पुलाच्या कठड्यावर झाडे उगवणार नाहीत याची काळजी बांधकाम खात्याने घेण्याची गरज आहे. ही झाडे वाढत असून पुलासाठी त्याचबरोबर वाहनांसाठी आणि रस्त्याने चालणार्या लोकांसाठीदेखील धोकादायक आहेत. त्यासाठी दरवर्षी व्यवसायिक गिर्यारोहक ट्रेकर्स असलेले विकास चित्ते हे दरवर्षी अशी सूचना श्रीराम पुलाबद्दल करीत असतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग हे अशा सूचना येण्याआधी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही. त्यामुळे यावर्षीदेखील दहिवली गाव परिसर विचारमंच यांना श्रीराम पुलाच्या कठड्यांवर उगवलेल्या झाड कापण्याची मागणी करावी लागत आहे.