वायू प्रदुषणातून होणार मुक्तता
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव शहरातील दत्त नगर परीसरातील आदिवासी आश्रमशाळेजवळील डम्पिंग ग्राऊंडला आग लागून वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाला होता. नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांनी त्याची दखल घेऊन या कचर्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. या कामाचा शुभारंभ 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे माणगावकर लवकरच मोकळा श्वास घेणार असून हा परीसर पूर्णपणे प्रदुषण मुक्त होणार आहे.
माणगांव नगर पंचायत प्रशासनाकडून या कामाची प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा करण्यात आला होता. त्या अनुषंगाने शासनाकडून या कामासाठी सुमारे 1 कोटी रुपये इतक्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली होती. नगरपंचायत प्रशासनाकडून नागरीकांच्या आरोग्यासाठी निर्माण झालेला धोका लक्षात घेता, कामाची ई-निविदा प्रक्रियाची कार्यवाही पूर्ण करून या कामाचे कार्यादेश दिलेले आहेत. अत्यंत आवश्यक व महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त माणगांव नगरीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यावेळी उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर, आरोग्य व स्वच्छता सभापती सुशिला वाढवळ, नगरसेविका सुविधा खैरे, विद्यमान नगरसेवक राजेश मेहता, अजित तार्लेकर, दिनेश रातवडकर, सचिन बोंबले, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी, अधिकारी विशाल कदम व शहर समन्वयक अतुल जाधव आदी उपस्थित होते.
20 वर्षांपासून खितपत पडलेल्या समस्येच्या निराकरणामुळे माणगांवकर आता मोकळा श्वास घेणार आहेत. अनेक वर्षांपासून पडलेल्या शेकडो टन कचर्याचे ढिगारे साफ होणार असून प्रदूषण युक्त गंभीर समस्येवर मात करण्यात येईल. त्यामुळे डंपिंग ग्राऊंड परिसरातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यी व रहिवासी आता मोकळा श्वास घेणार आहेत. त्यामुळे समस्त माणगांवकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
तीन गटात कचर्याची विल्हेवाट
आता या कचर्याच्या ढिगार्याचा निपटारा करण्यासाठी बायो मायनिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन शास्त्रोक्त पद्धतीने तीन गटात कचर्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यातील ओल्या कचर्यापासून खत तयार केले जाणार आहे. तर, प्लास्टीक कचरा कारखान्यांना देण्यात येणार आहे. अशा प्रकारे नगरपंचायतीने कचरा डंपिंगची समस्या मार्गी लावली आहे.