सौर उर्जेवरील पथदिवे बसविण्याची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या कर्जत चारफाटा येथील हुतात्मा भाई कोतवाल चौक येथील पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे कर्जत चार फाटा परिसरात अंधाराचे साम्राज्य दिसत असून शासनाने त्या ठिकाणी सौर दिव्यांचे पथदिवे बसवावेत, अशी मागणी होत आहे.
2022मध्ये सामाजिक कार्यकर्ते सुरेश बोराडे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी ठेकेदार कंपनीच्या सेस फंडातून मोठे दिवे असलेले पथदिवे बसवले होते. परंतु, आता त्या पथदिव्यांच्या खाली गेली अनेक महिने अंधार आहे. त्याचे कारण म्हणजे कर्जत चारफाटा येथील पथदिवे ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत त्या हालीवली ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे त्या पथदिव्यांचे वीज बिल थकले असून महावितरण कंपनीकडून त्या पथदिव्यांची वीज कापण्यात आली आहे.
चारफाटा हा कर्जत तालुक्यातील वाहतुकीचा केंद्रबिंदू असून रात्रीच्या वेळी एसटी बस, खासगी वाहने, टॅक्सी यांची रेलचेल असलेल्या या ठिकाणी रात्रीचा अंधार हा अक्षरशः धोका बनला आहे. नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीमधील जबाबदारीची गोंधळलेली स्थिती असून त्या पथदिव्यांची दुरुस्ती देखील कोणी करीत नाही. ग्रामपंचायत आणि नगरपरिषद यांच्या वादात कर्जत चारफाटा येथील पथदिवे अडकून पडले असून त्याचा फटका या भागातून पायी प्रवास करणार्या स्थानिकांना बसत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. अंधाराच्या विळख्यात सापडलेला हा महत्त्वाचा चौक पुन्हा उजळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटत आहे.
कर्जत चार फाटा भागात महामंडळाकडून कामे सुरू असून पथदिवे बाबत निर्णय घेतला जाणार असून या परिसर उजळण्यासाठी सौर ऊर्जेवर दिव्यांचा प्रकाश देता येईल काय याचा देखील अभ्यास सुरू आहे.
– संदीप पाटील, कार्यकारी अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ