43 लाख रुपये खर्चून ओल्या व सुक्या कचर्यातून करणार खतनिर्मिती
। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असतानाच माणगाव नगरपंचायत हद्दीत विविध कंपनीतील कामगार वर्ग व तंत्रज्ञही मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे कामगार तालुक्याच्या ठिकाणी रहात असल्याने शहरीकरणावर अधिक ताण पडत आहे. याचबरोबरच छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारीदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पर्यायाने माणगावचे शहरीकरण, नागरीकरण झपाट्याने वाढत असताना या शहरात दैनंदिन निर्माण होणार्या घनकचर्याचा प्रश्नही तितकाच बिकट बनत चालला आहे. माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा दैनंदिन घनकचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र, या डम्पिंग ग्राउंड भागात हा कचरा ठिकठिकाणी टाकल्याने तो परिसरात पसरत असून या भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे जनावरे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अखेर माणगाव नगरपंचायतीने खतनिर्मिती प्रकल्प उभारला असून त्यातून खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे माणगावकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
माणगाव नगरपंचायतीकडून दैनंदिन निघणारा कचरा ठेकेदारामार्फत उचलून तो डम्पिंग ग्राउंडवर साठवला जातो. त्याठिकाणी दुसर्या ठेकेदारामार्फत ओला व सुका कचर्याचे वर्गीकरण करून तो पुन्हा कंपनीकडे पाठवला जातो. तर ओल्या कचर्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. खतनिर्मितीचे काम गेले 25 दिवसापासून सुरु झाले असून दररोज माणगावमध्ये 6 टन कचरा गोळा केला जातो. तो खतनिर्मिती प्रकल्पासाठी वापरला जात असून त्याद्वारे दररोज जवळपास दीड टन खतनिर्मिती होवू शकते.
ओला व सुका कचरा बाजूला करून त्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेसाठी सुमारे 43 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली असून यांची निविदा काढण्यात आली आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे. या खतनिर्मितीसाठी पुढील 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दैनंदिन साठणारा कचरा हा ठेकेदारामार्फत उचलून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. या कचर्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करून त्या कचर्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याचे प्रयोजन करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
माणगाव नगरपंचायतीने खतनिर्मिती प्रकल्पासाठी या घनकचर्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून त्याची विल्हेवाट लावून या दैनंदिन गोळा केलेल्या कचर्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी महत्पपूर्ण पाउल उचलले आहे. माणगावात पूर्वीपासून एका खासगी जागेत कचरा टाकला जात होता. तेथे कचर्याचे ढीग असून त्या कचर्याला आग लागते. माणगाव नगरपंचायतीची अग्निशमन दलाच्या गाडीच्या पाण्याने ही आग विझवली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. त्यामुळे प्रदुषणाचा प्रश्न निर्माण होत आहे. आजही डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात कचर्याचे ढीग असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे माणगाव स्वच्छ व सुंदर कधी होणार? हा प्रश्नच आहे.
या कचर्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने कचर्याचे वर्गीकरण सुका, ओला, व प्लास्टिक व बाटल्या बाजूला करून माणगाव येथील नगरपंचायतीच्या जागेतील पाच एकर असणार्या डंम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावून खतनिर्मिती करावयाचे प्रयोजन सुरु झाले आहे.