। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ येथून वंजारपाडाकडे जाणारा रस्ता देवपाडा गावातून वारे गावाजवळ जाऊन मिळतो. कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग येथे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा बनला असल्याने नागरिकांच्या मागणीनूसार हा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. या रस्त्यावर देवपाडापासून वारे मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्याच्या बाजूला मातीची पट्टी टाकण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने नेमून दिलेल्या ठेकेदाराने आखडता हात घेतला आहे. त्यात साईड पट्टी टाकण्यासाठी मुरूम मातीऐवजी साधी माती टाकण्यात आली आहे.
नेरळ-वंजारपाडा-देवपाडा या हा रस्ता पुढे कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गला वारे गावाजवळ जाऊन मिळतो. देवपाडा गावापासून हा रस्ता बोरीचीवाडी येथून वारे गावाकडे जातो. या रस्त्यावर आणखी दोन आदिवासी वाड्या असून वाघेवाडी आणि गुडवण ठाकूरवाडीसाठी देखील आदिवासी लोक या रस्त्याचा वापर करतात. देवपाडापासून वारे या भागातील रस्त्याचे अंतर साधारणतः चार किलोमीटर असून या भागातील आदिवासी लोकांची अनेक वर्षांची मागणी होती. मात्र हा रस्ता अरुंद असल्याने जेमतेम एक वाहन जाईल एवढीच जागा आहे. त्यामुळे दुसरे वाहन रस्त्याने येत असेल तर त्या वाहनांसाठी जाणे सहज शक्य व्हावे, यासाठी साईडपट्टी टाकणे आवशयक आहे. स्थानिकांच्या मागणीनंतर रस्त्याचे काम मिळविणार्या ठेकेदाराने साईडपट्टी टाकण्यासाठी माती आणून टाकली. नव्याने बनविलेल्या रस्त्यावर साईडपट्टी करण्यासाठी मुरूम माती टाकावी लागते, मात्र संबंधित ठेकेदाराने पिवळसर माती आणून टाकली आहे. ती माती देखील त्याच ठिकाणी खोदून जवळच रस्त्याच्या बाजूला टाकून ठेवण्यात आली आहे. ती माती वाहने जाऊन अस्तव्यस्त होत असून साईडपट्टी टाकणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या रस्त्याच्या बाजूला ढिंग करून ठेवण्यात आलेली माती हि एका पावसात वाहून जाणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.