खरसई खारभूमी बंधार्‍याची दुरवस्था

60 एकर दुबार शेती नापीक ?
| म्हसळा | वार्ताहर |
तालुक्यातील खरसई पंचक्रोशीमधील खारभूमीलगत असलेल्या बनोटी, रेवली, आगरवाडा, गणेशनगर येथील खारभूमी बंधार्‍याला सन 1992 पासून ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळे लागवडीच्या शेत जमीनीत समुद्राचे खारे पाणी शिरून सुमारे 60 एकर जमीन नापीक झाली आहे.

येथील शेतकरी खारभुमीत दुबार पीक घेतात. परंतु जुन्या खारभुमीचा बंधारा फुटल्याने मागील 20 ते 22 वर्षापासून दुबार पीक घेणे बंद झाले आहे. शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाने खारभुमी बंधार्‍याची तातडीने दुरुस्ती करून देणे काळाची गरज असल्याची मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष परशुराम मांदाडकर यांनी केली आहे.तसेच वेळोवेळी संबंधित खातेप्रमुख,मंत्री महोदय,आमदार,खासदार,पालकमंत्री यांच्याकडे निवेदनेही दिलेली आहेत.

शेतकर्‍यांचे या गंभीर बाबीकडे शासनाने दुर्लक्ष केले असल्याने सदरची खारजमीन आता नापीक झाली असल्याचे मांदाडकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. खरसई पंचक्रोशी मधील खार जमीन दुरुस्त करून मिळावी म्हणुन शेतकर्‍यांनी अनेक वेळा आंदोलन केले आहेत तसेच वारंवार लोकप्रतीनिधींचे लक्ष वेधले आहे.शासन दरबारी अनेकवेळा खेटे मारूनही कोणीच लक्ष घालत नसल्याने आता तरी मायबाप सरकारने शेतकर्‍यांचे भावनेचा व मागणीचा सहानुभतीपूर्वक विचार करून या भागातील जुनी खारभूमि बंधार्‍याची तातडीने दुरुस्ती करून मिळावी अशी आग्रहाची मागणी परशुराम मांदाडकर यांनी केली आहे.

Exit mobile version