शेकाप शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांची मागणी
| पनवेल | प्रतिनिधी |
वाशी येथील मिनी सी शोरच्या धर्तीवर कामोठे येथील खाडी किनाऱ्यांचा विकास करा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केली आहे.
कामोठे शहरातील सेक्टर 34, 35 आणि 36 हे खाडी किनारी आहेत. खाडीमध्ये भराव टाकून या ठिकाणी इमारती बांधल्या आहेत. सिडको आणि पालिकेने या किनाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने भरती आली की खाडीचे पाणी इमारतींच्या संरक्षक भिंतीपर्यंत येते. त्यात नवी मुंबई विमानतळाचे काम करताना खाडीत भराव टाकल्याने भविष्यात कामोठेमधील खाडी किनाऱ्यांना देखील धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
साप, विंचू सारखे विषारी प्राणी देखील इमारतींच्या आवारात आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच भीतीपोटी नागरिक लहान मुलांना इमारतीच्या आवारात खेळण्यासाठी पाठवत नाहीत. खाडीच्या पाण्यापासून बचाव व्हावा यासाठी सिडकोच्या नियोजनात किनाऱ्या रस्त्यांच्या विकासाबाबतचा प्रस्ताव आहे. पनवेल पालिकेने हा नियोजित रस्ता पूर्ण करून नवी मुंबईमधील सागर विहार मिनी सी शोरच्या धर्तीवर विकास केल्यास कामोठे शहराच्याच नव्हे, तर पनवेल महानगर पालिकेच्या नाव लौकिकात भर पडेल. तसेच, कामोठेकरांना सकाळ, संध्याकाळ व्यायाम करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.
सिडकोने फायद्यासाठी कामोठेमध्ये इमारतींचे जंगल उभे केले. एकही उद्यान अथवा मैदान किंबहुना विरंगुळा केंद्र नाही. नागरिक सकाळी, संध्याकाळी रस्त्यांवर व्यायाम करतात. सिडकोने दुर्लक्ष केले तरी कमीत कमी पनवेल महापालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.