नाशिकच्या जागेसाठी महायुतीत घडामोडी

| नाशिक | वृत्तसंस्था |

लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. पण अजूनही महयुतीमधील जागांचा तिढा अद्याप सुटताना दिसत नाही. विशेष म्हणजे नाशिकच्या जागेसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली घडत आहेत. या जागेवर सध्याच्या घडीला शिवसेनेचा खासदार आहे. पण या जागेसाठी आधी भाजप जास्त आक्रमक होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जागेसाठी जास्त आक्रमक आहे. असे असले तरी शिवसेनेचे विद्यमान खा. हेमंत गोडसे नाशिकची जागा सोडण्यासाठी तयार नाहीत. हेमंत गोडसे हे गेल्या 10 वर्षांपासून नाशिकच्या जागेवर खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी गोडसे हे आग्रही आहेत.

गोडसे यांनी आपल्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या 15 दिवसांत अनेकवेळा भेट घेतली आहे. पण तरीही यांची उमेदवारी निश्‍चित होताना दिसत नाही. नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत हाय व्होल्टेज घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. कारण नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आपला यवतमाळचा दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेला रवाना झाले, तर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे देखील मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे नाशिकचे खा. गोडसे, शिवसेना पदाधिकारी भाऊ चौधरी यांच्यासह इतर महत्त्वाचे पदाधिकारी हे मुंबईत ठाण मांडून आहेत. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी गोडसे प्रयत्नशील आहेत. नाशिकच्या जागेसाठी मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी आणि बैठका घडत आहेत.

नाशिकच्या जागेसाठी मुंबईत खलबतं
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मुंबईत जोरदार खलबतं सुरु आहेत. हेमंत गोडसे मुंबईत ठाण मांडून आहेत. त्या अनुषंगाने ते आपल्या वरिष्ठांशी मुंबईत बोलतील आणि नाशिकची जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करतील. दादा भुसे यांचा आज नियोजित यवतमाळचा दौरा होता. पण ते आपला दौरा अर्धवट सोडून मुंबईत दाखल झाले आहेत. हेमंत गोडसे यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर छगन भुजबळ हे देखील आपली ताकद लावताना दिसत आहेत. नाशिकच्या जागेसाठी मुंबईत खलबतं होत आहेत. निर्णय नेमका काय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Exit mobile version