| ठाणे | वृत्तसंस्था |
हवामान खात्याने आगामी तीन ते चार दिवस ठाणे, मुंबईत उष्मा वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यातच या शहरांमध्ये सोमवारी (दि.20) लोकसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. त्यामुळे मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदारांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे अशा उष्म्यात मतदार आणि त्यांच्या सुरक्षेसाठी उन्हात उभे राहून पहारा देणार्या पोलिसांसाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा धावून आली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ठाण्यातील 20 हजार पोलिस आणि सर्व मतदान केंद्रांना सात हजार प्रथमोपचार पेटी आणि ओआरएच पाकिटाचे वाटप केले आहे.
देशात यंदा 18 व्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा पाचवा आणि राज्यातील अंतिम टप्पा ठाणे, मुंबईत सोमवारी पार पडणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघात 15 हजार पोलिस फौजफाटा तैनात आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता पोलिस त्यांचे कर्तव्य बजावले जाणार आहे. मतदारांनीदेखील देशाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या मतदान उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक आयोग, राज्य सरकार, विविध सामाजिक संस्थांकडून करण्यात आले आहे. प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. हवामान विभागाकडून ठाण्यासाठी देण्यात आलेल्या उष्माघाताच्या इशार्यामुळे ठाणे जिल्हा आरोग्य विभागदेखील सज्ज झाला आहे.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मुख्य जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सामान्य रुग्णालयांतर्गत येणार्या ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र, महापालिका रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर जिल्हा आरोग्य विभागाने सात हजाराहून अधिक प्रथमोपचार पेट्या पाठवून दिल्या आहेत. या किटमध्ये प्रथमोपचारासाठी लागणारी सर्व औषधे, बँडेज, ओआरएच ठेवले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालय आणि महानगर पालिकांच्या रुग्णवाहिका तैनात ठेवल्या आहेत. यासोबतच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना 20 हजार ओआरएचची पाकिटे देण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि महापालिका रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. मतदारांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावे, घरातून बाहेर पडताना छत्री, गॉगल, टोपीचा वापर करावा, शक्यतो मतदानाची रांग सावलीत असावी, सोबत स्वच्छ पाणी ठेवावे. मळमळ, चक्कर, धाप लागल्यास अथवा तोंड कोरडे पडू लागल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार पोलिसांसाठी 20 हजार ओआरएच पाकीटे दिली आहेत.
डॉ. कैलास पवार,
शल्य चिकित्सक,
जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे