दिवेआगर सुवर्ण गणेशाच्या मुर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शरद पवार यांना कोकण हा विभाग अत्यंत आवडतो. येथील रेल्वे, येथील निसर्ग रम्य ठिकाण इत्यादी. मुंबई – गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी नितीन गडकरी देखील लक्ष देत आहेत. लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण करणार असून या विभागाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुर्नप्रतिष्ठापना पूजा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रायगड पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भारत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चोरीचा तपास करणार्या तपास यंत्रणा, न्याय व्यवस्थेतील सरकारी वकील, पोलीस अधिकारी, मृत झालेले सुरक्षा रक्षक यांचे कुटुंब, सुवर्ण मुखवटा तयार करणार्या कारागीरांचा सन्मान अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.दिवेआगर येथील मंदीरातील गणेशाची सुवर्ण मुर्ती ही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. गेल्या 9 वर्षांपूर्वी ती चोरट्यांनी चोरली होती. यावेळी दोन सुरक्षा रक्षकांना आपला जीव गमावावा लागला होता. तेव्हापासुन दिवेआगर येथील महत्व काहीसे कमी झाल्याचे दिसून येत होते.दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली असून त्याच्या संरक्षणासाठी आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे जर कोणी सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची चोरी करण्याचा प्रयत्न केल्यास याठिकाणी असलेल्या आधुनिक यंत्रणा कार्यरत होतात. त्यामुळे कर्कश आवाजाद्वारे नागरिकांना वेळीच कल्पना मिळते व सर्व सतर्क होतात. त्यामुळे सुवर्ण गणेश मुर्तीच्या मुखवट्याची चोरी होणार नाही, याची प्रशासनाद्वारे पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. तसेच यावेळी दिवेआगर येथील दोन कोटी रुपयांच्या नळ पाणी योजनेचा शुभारंभ व दिवेआगर पोलीस चौकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यापुढे मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले कि, आजचा दिवस माझ्या व दिवेआगर नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद देणारा दिवस आहे. दिवेआगर सोहळ्यास बोलविल्याबद्दल आभारी आहे. दिवेआगरमध्ये 2 कोटीची नळ पाणी योजना राबविण्यात आली आहे. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर मदत करण्याचे केंद्राचे निकष बदलणे गरजेचे आहे.इतर राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणार्या यंत्रणा मधील वाहक चालक यांना मिळणारा पगार येथील चालक वाहकांना मिळाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत.आजच्या सुवर्ण दिवसानंतर दिवेआगर येथील पर्यटन आणखी जोमाने वाढेल. कोकणचा विकास झालाच पाहिजे, त्यासाठी मला जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
विरार-मुंबई-अलिबाग कॉरिडोरसाठी 40 हजार कोटीविरार-मुंबई-अलिबाग हा मार्ग 40 हजार कोटी रुपये खर्चून 126 किलोमीटर चा विरार अलिबाग कॉरिडॉर सुरू होत आहे. यामुळे विरार, भिवंडी, पनवेल, पेण, उरण, अलिबाग असा मल्टी मोडल कॉरिडॉर आपण उभारतो आहोत. हा कॉरिडॉर जेएनपीटी, नवी मुंबई विमान तळ, नवी मुंबई न्हावा-शेवा या मार्गांना जोडणारा हा नवा मार्ग विकासासाठी खुला होणार आहे.
कोकणातील फळांवर प्रक्रिया करुन वाईन बनविण्याचा मानसरायगड जिल्ह्यात नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत असून जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. त्यासाठी अदिती सतत पाठपुरावा करत असते. मी आढावा घेत असतो. यामध्ये पहिली 100 मुलांची तुकडी असणार आहे. तसेच कोकणात येणार्या वेगवेगळ्या फळांवर प्रक्रिया करून त्यापासून वाईन बनविता येईल का, याबद्दल प्रयत्न सुरू केले आहेत.
24 मार्च 2012 रोजी दुर्देवी घटना घडली व येथील पर्यटन खंडित झाले. परंतु महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे न्याय विभागाने व गृह विभागाने दिलेल्या सूचनेनुसार आज आपल्याला हा सुवर्ण दिवस पाहायला मिळाला. दादा तुमच्या हस्ते हा योग जुळून आल्याने मला मनापासून आनंद होत आहे.दिवेआगर येथील पर्यटन वाढीला नक्कीच चालाना मिळेल, यात तिळमात्र शंका नाही. दिवेआगरमध्ये 2 कोटीची नळ पाणी योजना राबविण्यात आली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील 72 ठिकाणी पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.
अदिती तटकरे, पालकमंत्री
कोकणवासियांकडून अजित दादा यांचे आभार. आज सुवर्ण दिवस पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी प्रत्येक वेळी कोकणाला मदत करत आहे. येथील शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी वेळोवेळी मदत केली जात आहे. नुसतेच पर्यटन केंद्र न बनविता कोकण शैक्षणिक हब कसे होईल, यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सढळ हाताने मदत केली आहे. आज हा सुवर्ण दिवस पाहायला मिळाला व यावेळी माझा सत्कार केला याचा तुम्हाला कधीच कमीपणा वाटणार नाही, याची खात्री देतो. याशिवाय रत्नागिरी व सिंधदुर्ग जिल्ह्याला भरघोस मदत झाली पाहिजे अशी मागणी करतो.
उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री