| मुंबई | प्रतिनिधी |
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असला तरी संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पारंपरिक रीती रिवाज पालन करण्याचे अधिकार दिले आहेत. मस्जिदच्या भोंग्यावरून देण्यात येणार्या अजानच्या आवाजाची तीव्रता किती आहे, त्याची तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. मात्र, भोंग्याच्या प्रश्नावरुन जातीय तेढ निर्माण होणार नाही आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळणार नाही, याची सर्व पक्षाच्या नेत्यांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, अशी कणखर भूमिका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते.
मुस्लिमांच्या मस्जिदवरील भोंग्यावरून देण्यात येणार्या अजानच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्यात राजकीय वादळ उठले आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार जयंत पाटील आपली भूमिका मांडली. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, बहुजन विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर, आ. कपिल पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. क्षितीज ठाकूर, मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, समाजवादी पक्षाचे रईस पठाण, एमआयएमचे वारिस पठाण, वंचित बहुजन पक्षाच्या रेखा ठाकूर, आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर, आरपीआय (गवई गट) राजेंद्र गवई आदींसह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील शांतता, कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी खबरदारी घ्यावी. समाजात जातीय तेढ वाढेल, कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशी वक्तव्ये कुणी करु नयेत.
आ. जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस