मुरूडमधील मोऱ्यांची कामे अपूर्णावस्थेत

अपघातांचे वाढते प्रमाण; वाहतुक कोंडीमुळे पर्यटकांसह स्थानिक त्रस्त

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातर्फे मुरुड ते साळाव या 32 किलोमीटर रस्त्याचे सध्या काँक्रीटीकरण सुरू आहे. तसेच, हा रस्ता जलद गतीने करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, दीड वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला सुस्थितीत असलेला डांबरी रस्ता उखडण्यात आला आहे. या डांबरी रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी एकूण 32 मोऱ्या तयार करण्याचे काम सुरु आहे. परिणामी, काशिदसह मुरुडला येणाऱ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

सध्या रेवस-रेड्डी रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या मार्गावरील मुरूड-साळाव या रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मोऱ्या तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु, दिड वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला आणि सुस्थितीत असलेला हा रस्ता मोऱ्यांच्या कामासाठी उखडण्यात आला आहे. त्यामुळे काशिदसह मुरुडला येणाऱ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. मुळात हा रस्ता दुपदरी नसल्याने याठिकाणी वाहतुक कोंडीची समस्या स्थानिकांसह पर्यटकांना जाणवत आहे. ठेकेदाराने मुरूड-साळाव या मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून मोऱ्या खणून ठेवल्या आहेत. त्यामुळे ठेकेदाने काही ठिकाणी पर्यायी मार्ग सुद्धा काढला आहे. परंतु, काही ठिकाणी पर्यायी मार्ग काढता न आल्याने मूळ रस्ता अरुंद होऊन दोन्ही बाजूला वाहतुक कोंडी होत आहे. तसेच, या मोऱ्या गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्णाववस्थेत आहेत. तसेच, हा रस्ता तातडीने काँक्रिटचा रस्ता बनवण्याचा घाट घातला असून यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देखिल मंजूर झाला आहे. परंतु, या मार्गावर दीड वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या डांबरिकणाचा खर्च वाया गेल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

मुरुड-मुंबई हा महत्वाचा मार्ग असून येथे दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. परंतु, सद्य परिस्थिती पाहता हा रस्ता प्रवाशांकरीता सुरक्षित राहिला नसल्याने गंभीर दुर्घटना देखील घडत आहेत. दि.6 रोजी वनविभागातील तिनवीरा येथे कार्यरत असलेले वनरक्षक सुरज सारंगे यांचा रात्रीच्या सुमारास या मार्गावरील सह्याद्री टुरिस्ट होम समोर मोरीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. काशीद संपताच बारशीव येथील घाट रस्ता सुरू होतो. या रस्त्याच्या अगदी सुरुवातीलाच संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. काही अंशी हे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु, खूप दिवस हे काम अपुर्ण सोडण्यात आल्याची तक्रार प्रवासी वर्गातून होत आहे. काशिद व ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक याठिकाणी येत असतात. अशावेळी या मार्गावरील मोऱ्यांची कामे रेंगाळली असल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत.

या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने बहुतांशी वाहन चालक गांरबी किंवा भालगाव मार्गे रोहा या पर्यायी मार्गाचा अवलंब करीत आहेत. मुरुड ते अलिबाग असे 50 किमी अंतर गाठायला दोन ते अडीच तासांचा प्रवास अतिशय कंटाळवाणा वाटतो. मुरुड-सुपेगाव मार्गे अलिबाग हा रस्ता चांगला असला तरी सुपेगाव-फणसाड अभयारण्यालगतचा 2 किमीचा पट्टा डांबरीकरणाशिवाय आहे. वनविभागाच्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार हे काम रोखल्याची माहिती मिळत आहे. मुंबईबाजुकडून मुरूडमध्ये येणाऱ्या बहुतांशी पर्यटकांसह स्थानिक आपली चारचाकी वाहने तुर्त याच मार्गाने नेत आहेत. तर, मुंबईकडे जाणारे पर्यटक गारंबी-केळघर मार्गे रोहा करून जाणे पसंद करत आहेत. परंतु, या पर्यायी मार्गांपेक्षा मुरूड-अलिबाग हाच मार्ग पर्यटकांसह स्थानिकांना सोयिस्कर वाटतो. पावसाळ्याला काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे सर्वप्रथम या मार्गावरील मोऱ्यांची कामे मान्सून पूर्व तातडीने व उत्तम दर्जाचा बनवावा, अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहेत.

मुरूडधील रोजगार अडचणीत
एका बाजुला रस्ता खणलेला अवस्थेत, तर दुसऱ्या बाजूला अपुर्णावस्थेत मोऱ्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. मुरूडमध्ये येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांना वेळेत निश्चित स्थळी पोहोचण्याचे गणित चुकत आहे. परिणामी मुरूडमध्ये पर्यटकांचा ओघ कमी होत आहे, अशा तक्रारी येथील व्यावसायिकांडून होत आहे. मुरुड तालुक्यात स्थानिक नागरिकांना येथील नामांकित कंपनीचा रोजगार सोडला तर पर्यटन व्यवसायाखेरीज अन्य रोजीरोटीचे साधन नाही. त्यामुळे रस्ते व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे व पर्यटकांचा ओघ कायम वाढावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Exit mobile version