रसायनी । वार्ताहर ।
पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत असल्याने नाराजी व्यक्त होत असून खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली आहे.पाताळगंगा अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवर; तसेच वासांबे मोहोपाडा कामगार वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे खड्डे डांबर टाकून बुजवण्यात आले होते. मात्र, येथून वाहनांची वर्दळ कमी असतानाही पुन्हा खड्डे पडले आहेत, अशी औद्योगिक वसाहतीतील नागरिकांची तक्रार आहे. यात नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी अतिरिक्त पाताळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष मारुती पाटील यांनी केली आहे.