| उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील कोळी बांधवांना उदरनिर्वाहासाठी शेती आणि मासेमारी हे दोनच पर्याय आहेत, परंतु सध्या खोल समुद्रात मासळी मिळणे कठीण झाले असल्याने सुक्या मासळीच्या विक्रीचा पर्याय स्वीकारला आहे.
कोळी बांधवांनी आपल्या परंपरागत व्यवसायाला पुनर्जीवित करून समुद्रातील मासळी सुक्या मासळीत रूपांतरित करून तिच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. मुंबई, करंजा, मोरा या बंदरांतून ओली सुकट, ओल्या वाखट्या, बोंबिल अशी विविध प्रकारची मासळी रस्त्याच्या कडेला उन्हात सुकवून तिचे सुक्या मासाळीत रूपांतर केले जाते. पावसाळ्यात या सुक्या मच्छीला अधिक मागणी असल्याने चांगले आर्थिक उत्पन्नही मिळत आहे. त्यामुळे सुकट, वाखट्या, बोंबिल, टेंगली, शिंगालासारख्या सुक्या मच्छीच्या विक्रीतून अनेकांच्या कुटुंबांना आधार मिळाला आहे.