दर्यात वादळ आल्याने नौका पुन्हा बंदरात

| मुरूड | वार्ताहर |
ऐन मासेमारी हंगामामध्ये मच्छिमारांवर संकट पे संकट अशी परिस्थिती ओढविली आहे. मागील आठवड्यात आलेले वादळी पाऊस आणि वार्‍यांचे तुफान शमले नाही तोच पुन्हा अरबी समुद्रात दुपारनंतर आधिक मोठ्या प्रमाणात वादळी वारे उठल्याने घबराट उडाली आहे. रविवारी खोल समुद्रात मासेमारीस गेलेल्या नौका पुन्हा माघारी वळल्या असून त्वरेने आगरदांडा- दिघी बंदराकडे येण्यासाठी नौकांची रीघ लागली आहे.

एकदरा पुलावर तर वार्‍यांचा वेग मोठा असून घबराटीचे वातावरण आहे.रविवारी अनेक नौका पुन्हा तयारीने समुद्रात गेल्या होत्या त्या परत येत असल्याने नुकसानीचा मोठा फटका बसणार आहे. मोठा मासळी सीझन हातून निसटत असल्याने मच्छिमार हवालदिल झाले आहेत. येथील समुद्रात आलेली मासळी सीझननंतर गुजरात हद्दीतील समुद्रात जात असते.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मच्छिमारांना मिळणार्‍या मासळीचे प्रमाण घटते अशी माहिती एकदरा येथील रोहन निशानदार या नाखवाने दिली.वादळ पुन्हा फिरल्याने मच्छिमार चक्रावून गेले आहेत. समुद्रात पळापळ पुन्हा सुरू झाली असून नौका किनारा गाठण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे मुरूड किनार्‍यावरन दिसत आहेत.

Exit mobile version