सततच्या आगींमुळे वनसंपदा, सजीव सृष्टीचे होतेय नुकसान

। चिरनेर । वार्ताहर ।

तालुक्यात डिसेंबर महिन्यातच वणवे लागायला आणि लावायला सुरुवात झाली असून या परिसरातील गवतालाही आगी लावल्या जात आहेत. अशा आगींमुळे टाकीगांव हद्दीतील बस स्टॉप जवळच्या माळरानातील वनसंपदा व सजीवसृष्टी ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. या ठिकाणी आग लागल्याचे समजताच चिरनेरच्या फ्रेंड्स ऑफ नेचरचे व्यवस्थापकीय संचालक जयवंत ठाकूर, त्यांचे सहकारी यश, युवराज शर्मा, हिंमत केणी, दिनेश चिरनेरकर, शेखर म्हात्रे या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या भडकलेल्या आगीशी झुंज देऊन, आग पूर्णपणे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

ही आग पूर्णपणे विझविण्यात या टीमला यश आले पण सारं व्यर्थ गेले कारण आग इतकी भडकली होती की, गवत जळाल्याने गवतावर अवलंबून असणार्‍या गुरे ढोरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या आगीचे रूपांतर प्रचंड वणव्यात झाल्याने, परिणामी आगीत झाडे झुडपे व पशु पक्षांची बोरीच्या झुडपांवर असणारी घरटी, अंडी आणि त्यांची लहान पिल्ले तसेच सूक्ष्मजीव व सरपटणारे प्राणी यांचा जळून मृत्यू होऊन, सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होताना नजरेत दिसत आहे.

ही वणव्याची आग हिरवीगार वनसंपदा नष्ट करीत असताना, या वणव्यांवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. आपली जंगले म्हणजे आपली फुफ्फुसे आहेत. ती सुरक्षित राहिली तर आपले आरोग्य सुरक्षित राहील, असे फ्रेंड्स ऑफ नेचरचे व्यवस्थापकीय संचालक जयवंत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर वणवे विझविणे हे केवळ वनखात्याचेच काम नसून, प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे वनविभागाबरोबर प्रत्येक नागरिकाने ही बाब गंभीरतेने घेऊन, यावर तात्काळ उपाय योजना करणे आवश्यक आहे. कारण जंगल भागात राहणारे ससा, भेकर, वानर, रानडुक्कर तसेच अन्य पशु पक्षांची अन्न पाण्यासाठी खूप वाताहात होत असते. या सर्व पशुपक्षांना अन्न पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागतन आहे. परिणामी या ठिकाणी वणवे लागणार नाहीत, याची दक्षता व खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे.

Exit mobile version