आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश; आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट
| उरण । वार्ताहर ।
तालुक्याचे वैभव असलेल्या व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असलेल्या उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर गुरुवार (दि.16) दुपारी अंदाजे पाचच्या सुमारास किल्ल्यावर मध्यमागी जिथे दाट झाडे आहेत अशा ठिकाणी अचानक वणवा लागला. बघता बघता वणव्याने प्रचंड रौद्ररूप धारण केले होते. मात्र द्रोणागिरी पर्वतावर लागलेला वणवा विझविण्यात डाऊरनगर येथील लिंबाच्या वाडीवरील आदिवासी बांधवांना व शिवराज युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना यश आले आहे.
मात्र अधून मधून केव्हाही या किल्ल्यावर वणवा लागत असल्याने, तसेच एवढ्या उंच व कठीण जागेत कोणतेही वाहन किंवा साधन सामुग्री नेता येत नसल्याने लागलेली आग विझविणे हे मोठे जोखमीचे काम झाले आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता ही आग विझविण्यासाठी मंगेश कातकरी, रमेश कातकरी, अरुण वाघे, संदिप कातकरी, सागर कातकरी, हनुमंत वाघमारे, प्रकाश कातकरी, मंगेश कातकरी, भगवान कातकरी, बाळकृष्ण कातकरी, विजय कातकरी, विश्वास कातकरी, मनिष कातकरी तसेच शिवराज युवा प्रतिष्ठानचे द्रोणागिरी गड संवर्धन गणेश माळी यांच्या समवेत 10 ते 12 कार्यकर्ते यांनी शर्थीचे प्रयत्न करून आपला जीव धोक्यात टाकून आग विझविली.
आग विझवली नसती तर सर्व झोपड्या जळून खाक झाल्या असत्या, तसेच या पर्वताला लागूनच भारत सरकारचा ओएनजीसीचा प्रकल्प आहे. या आगीमुळे या केमिकल युक्त ओएनजीसी प्रकल्पाला खूप मोठा धोका होता. सुदैवाने धोका टळला आहे. हि आग विझविण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केलेल्या सर्व आदिवासी बांधवांचे, द्रोणागिरी किल्ल्याचे संवर्धन, संरक्षण करणार्या शिवराज युवा प्रतिष्ठानच्या सर्व मावळ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र हि आग नेमकी कशी लागली, कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.
अधून मधून केव्हाही वणवा लागत असल्यामुळे उरणच्या द्रोणागिरी किल्ल्याचे संपदा, सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. उरणमध्ये अनेक डोंगरे, किल्ले, वनसंपदा मोठ्या प्रमाणात असून या परिसरात वणवा लागण्याच्या अनेक प्रकार घडत आहेत. तर काही समाजकंटक आपल्या स्वार्थासाठी येथे आग लावत असल्याचे अनेकदा पाहावयास मिळाले आहे. त्यामुळे अशा आगी लागू नयेत यासाठी सर्वांनी एकत्र येउन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे उरणमधील विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी, शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे.