| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जातपंचायतीचा जाच, चार कुटूंबाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न राज्यात जातपंचायतीच्या जाचाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातही जात पंचायतीच्या जाचातून सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न झाला.
गेल्या काही दिवसात जात पंचायतीच्या जाचाचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातच रायगड जिल्ह्यातील नवघर येथील कोळीवाड्यातील जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून चार कुटूंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला.
पेण तालुक्यातील नवघर कोळीवाडा येथे तीन कुटुंबीयांना गावातील पंच कमिटीकडून वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आपल्या कुटुंबीयांना गाव पंच कमिटीकडून पुन्हा वाळीत टाकल्याचा आरोप देवेंद्र मारुती कोळी आणि त्याच्या कुटुंबीयांनी केला. नवघर कोळीवाड्यातील जातपंचायतीच्या जाच आणि जुलमाला कंटाळून चार कुटुंबांनी रायगड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे हा बाका प्रसंग टळला.
वाळीत प्रकरणातील कुटूंबियांनी पंच कमिटीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. तसंच आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर का होईना पण आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
पीडित कुटूंबाचे कुटूंबप्रमुख देवेंद्र कोळी,प्रगती कोळी यांनी यावेळी आपली व्यथा मांडली. जात पंचायतीच्या जाचामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या कोळी कुटूंबाशी पोलिस निरीक्षक एस डी सणस यांनी संवाद साधला.