पनवेलमध्ये शिवसेनेची बैठक
| पनवेल |वार्ताहर |
नरेंद्र मोदी यांनी राजकारण करणे थांबवावे; शिवसेनेच्या गळ्याला नखे मारण्याचे काम त्यांनी करू नये तर शिवसेना ही महाराष्ट्राची गरज नाही, हिंदू राष्ट्राची गरज आहे, देशाची गरज आहे त्यामुळे कोणीही गद्दारी केली तरी शिवसेना डगमळणार नाही एकसंघ होऊन पुन्हा उभारी घेईल असे प्रतिपादन माजीकेंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शनिवारी (दि.25 जून) खारघर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रायगड जिल्हा पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करताना केले.शिवसेनेशी गद्दारी करणार्या आमदारांना रायगडात थारा न देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या बैठकीला खा. श्रीरंग बारणे, जिल्हासंपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हासंपर्क प्रमुख विलास चावरी, जिल्हासंपर्क प्रमुख सदानंद थरवळ, माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख अनिल नवघणे, महिला आघाडी जिल्हा संघटिका रेखा ठाकरे, जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, उपजिल्हा संघटिका कल्पना पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश राहाळकर, युवासेना जिल्हा विस्तारक ओंकार चव्हाण, युवासेना जिल्हाधिकारी मयुरेश जोशी, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, महिला आघाडी,युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गीते यांनी सांगितले की, शिवसेनेशी बेईमानी खपवून घेतली जाणार नाही शिवसैनिकांच्या जीवावर तुम्ही आमदार झाले आहात, गद्दारी करून तुम्ही त्यांचा अपमान केला आहे या पुढे कुठल्याही पक्षातून तुम्ही निवडणूक लढवा आमचे बहादूर शिवसैनिक तुम्हाला मातीत गाढल्याशिवाय राहणार नाहीत असा निर्धार बैठकीत केला असल्याचे त्यांनी सांगितले
खा. श्रीरंग बारणे यांनी पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, या गद्दारांना वेशीवरच अडवण्याचे काम शिवसैनिकांनी केले पाहिजे या पुढची निवडणूक ही आव्हानात्मक निवडणूक असणार आहे त्यामुळे कोणीही बेईमानी न करता एकनिष्ठ राहून पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याचे काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आत्ता आपण इर्षेने व ताकदीने उतरायचं आहे असे त्यांनी सांगितले
जिल्हासंपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मातोश्री हे आम्हा शिवसैनिकांचे मंदिर आहे तर ठाकरे कुटुंबीय हे आमचे दैवत आहे त्यांनी आम्हाला घडवले आहे गद्दारांना, जिल्ह्यात माफी नाही असे त्यांनी सांगितले तसेच यावेळी बोलताना मा. आमदार जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी सांगितले की एकत्रित येऊन हा लढा आपल्याला लढायचा आहे तसेच शिवसेना मजबूत करण्याचे काम तुमच्या साथीने करायचे आहे, गेले त्यांचा विचार करण्यापेक्षा एकत्रित पणे काम करून शिवसेनेला पुन्हा उभारी द्यायची आहे असे त्यांनी सांगितले तर जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की अशी अनेक गिधाडे पक्षात आली व गेली, पण शिवसैनिक ठाम आहे त्यामुळेच आत्ता जिल्ह्यात ते मातीत मिळाल्या शिवाय राहणार नाही असे ही त्यांनी सांगितले तर जिल्हाप्रमुख अनिल नवघणे यांनी सुद्धा गद्दार आमदारांचा समाचार घेताना आत्ता तालुका पातळीवर बैठका व मेळावे घेऊन या गद्दारांच्या विरोधात रान उठवायला पाहिजे असे आव्हान त्यांनी केले.
गद्दारांचा पुतळा जाळला
या बैठकीनंतर शिवसेनेशी गद्दारी करणारे एकनाथ शिंदे, भारत गोगावले, महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे या चौकडीचा प्रतीकात्मक पुतळा बनवून शिवसैनिकांनी जाळुन त्यांचा निषेध केला तसेच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कळंबोलीतही जाळपोळ
कळंबोली शिवसेना शाखेसमोर आज सकाळी कट्टर शिवसैनिकांनी गद्दारी करणार्या आमदारांचे प्रतीकात्मक पुतळे करून त्यांचे दहन केले व त्यांच्या विरोधात निषेधात्मक घोषणाबाजी केली. जमील खान, विवेक गडकरी, रामा देवरमनी, सचिन मोरे, दीपक कोडवती, कपिल जमदाडे, अंकुश कबुगडे तसेच सर्व पदाधिकार्यांनी कळंबोली शिवसेना शहर शाखेत एकत्र येऊन त्यांच्या पुतळ्यांचे दहन केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने राजकारण करणे थांबवावे,शिवसेनेच्या गळ्याला नखे मारण्याचे काम त्यांनी करू नये.
अनंत गीते, माजी केंद्रीय मंत्री