सरकारकडून मागण्या पूर्ण करण्यास दिरंगाई
| अलिबाग | प्रमोद जाधव |
अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी बेमूदत संप पुकारला आहे. या संपाला अठरा दिवस पूर्ण झाले आहेत. संपामुळे अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे. मात्र, अंगणवाड्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यास सरकार उदासीन ठरल्याने जिल्ह्यातील असंख्य शाळांमध्ये आजही शुकशुकाट आहे. सरकारच्या ताठर भूमिकेचा फटका ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
लसीकरण मोहीम, गरोदर माता, स्तनदा मातांचे लसीकरण, पोषण आहार, गृहभेटी, 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहाराबरोबर पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भौतिक विकासाच्या दृष्टीने हसत खेळत शिक्षण देणे, ई-आकार प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, ऑनलाईन माहिती भरणे, रजिस्टर भरणे, जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे, शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबविणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे, भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवून देणे, किशोरवयीन मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी निधी मिळवून देणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासोबत काम करणे, अशी अनेक कामे अंगणवाडी सेविका करीत आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, भरीव मानधन जाहीर करावे, सामाजिक सुरक्षा मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सोमवार दि.4 पासून संप सुरू केला आहे. शाळांमधील मुलांच्या किलबिलाटाला ब्रेक लागला आहे. गजबजाणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये 18 दिवसापासून शुकशुकाट निर्माण झाला आहे.
रायगड जिल्ह्यात शंभर टक्के अंगणवाड्या बंद नाहीत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तीन संघटनापैकी एका संघटनेने संप पुकारला आहे. मुलांचे शिक्षण गेल्या अठरा दिवसात थांबले आहे. मात्र कुपोषण रोखण्यासाठी ग्रामपंचायत व महिला बचत गटाची मदत घेऊन पोषण आहार देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
निर्मला कुचिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला-बालकल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद
तुटपूंज्या मानधनामध्ये अंगणवाडी सेविका काम करीत आहेत.मानधन वाढविण्यासाठी अनेकवेळा सरकारकडे मागणी केली आहे. फक्त आश्वासने देण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे आम्ही संपाची भूमिका घेतली आहे. अठरा दिवसांपासून संप सुरू आहे.अजूनपर्यंत सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.
जिवीता पाटील, जिल्हा प्रमुख
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, रायगड