| सुधागड-पाली | वार्ताहर |
जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील अंबा नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीपात्रात घाण व कचरा, वाळू उपसा यामुळे नदीचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे. जांभुळपाडा येथे वाहणार्या अंबानदी नदीपात्रात कचरा आणून टाकला जात असल्यामुळे या नद्या आहेत की डंपींग ग्राऊंड हा प्रश्नच पडला आहे. एकीकडे पर्यावरणप्रेमींकडून नद्या वाचविण्यासाठी विविधस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. परिसरातील नागरिक कचरा मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आणून टाकण्यात येत आहे. प्रदूषित करण्यासाठी मोठा हातभार लावला जात आहे. बिनधास्त नदीपात्राचे डंपिंग ग्राऊंड करीत आहेत.नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. कायम दुर्गंधी असते.
कचर्यासोबतच काटेरी झुडुपे, मोठी झाडे, कॅरिबॅग तसेच दारूच्या बाटल्या ढिग पडलेला आहे. नदीपात्रांमधून कचरा व पाणी प्रदूषित होण्याला नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. घरा-घरांमधून साठलेला कचरा प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून या ठिकाणी आणून टाकण्यात येतो. त्यामुळे प्लास्टीकच्या पिशव्या ठिकठिकाणी अडकलेल्या दिसतात. नागरिकांनीही पर्यावरण व जलस्त्रोतांची काळजी घेण्याची गरज आहे. अशा प्रकारचा कचरा, प्लास्टीक पिशव्या दारुच्या बाटल्या या पात्रांत टाकू नये अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.