एक मार्गाचे काम कधी पूर्ण होईल?
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गाला लागलेली साडेसाती दिवसेंदिवस वाढतच आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थीती निर्माण झाली असून बुजवण्यासाठी टाकलेली खडी व मातीमुळे सध्या पावसाचा खोळंबा आल्याने मुंबई-गोवा महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहन चालक व प्रवासी अक्षरशः हैरण झाले आहेत. तर खांब-कोलाड-आंबेवाडी नाक्यावरील नागरिकांचा जीव गुदमरत असल्याने संताप व्यक्त केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, खड्ड्यांमुळे या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. सदरचे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याकरिता खडी व मातीचा वापर केला आहे. नागोठणे, वाकण, सुकेळी, खांब, कोलाड, वरसगाव इंदापूरदरम्यान या मार्गावरील अवजड वाहनांमुळे खड्ड्यांतील खडी व रेती बाजूला होऊन धुळ हवेत उडते. यामुळे हवेमध्ये धुळीचे साम्राज्य पसरल्याने समोरील गाडीसुद्धा वाहन चालकांना दिसत नाही. खड्डे भरण्याकरिता वापरण्यात आलेल्या रेती, खडीवरून मोटारसायकल घसरून अपघाताचे ही प्रमाण वाढले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करण्याचे काम गेली 17 वर्षे सुरू आहे. दरवर्षी या महामार्गावर लाखो खड्डे पडतात रस्त्यावर पडलेले खड्डे हे कायम असून, खड्ड्यांच्या त्रासाबरोबर आता मार्गालगत असलेली घरे, बाजारेठांमध्ये, तसेच वाहन चालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे व धुळीमुळे वाहनचालकांना तर अक्षरशः सुकेळी ते तीसेदरम्यानच पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत तर करावी लागतेच मात्र त्या पाठोपाठ धूळदेखील नका तोंडात घशात जाऊन आजाराला सामोरे जावे लागत असल्याचा संताप वाहन चालक करत आहेत.
या महामार्गावर अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. गेली आठ दिवस पावसाने विश्रांती घेतली खरी मात्र भयानक पडलेले खड्डे तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांच्या घशा तोंडात जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
डॉ. मंगेश सानप, सामाजिक कार्यकर्ते