इको वाहनाची रिक्षाला धडक; चिमुकलीचा मृत्यू

अन्य चार जखमी; बदलापूर, मुंबईत उपचार

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ-कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवासी रिक्षाला इको कार ने धडक दिल्याची घटना गुरुवारी घडली. या अपघातात रिक्षा मधील चार प्रवासी आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाले. दरम्यान, या अपघातात एक अडीच वर्षाची मुलगी रुग्णालयात उपचार घेताना मयत झाली, तर एक लहान मुलगा अत्यवस्थ आहे. त्याला अधिक उपचारासाठी बदलापूर येथून मुंबईला नेण्यात आले आहे. नेरळ पोलीस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दामत येथील रिक्षाचालक नदीम मुश्ताक नजे हे आपली प्रवासी रिक्षा घेवून 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता नेरळ कडे येत होते. त्यावेळी सौशल्या अपार्टमेंट समोर मूळची मुंबई बांद्रा येथील एक महिला आपल्या दोन मुलांसह रस्त्याच्या कडेला प्रवासी रिक्षा पकडण्यासाठी नेरळ बाजूच्या रस्त्याला येत होत्या. त्यावेळी प्रवासी येत असल्याचे पाहून रिक्षाचालक नदीम नजे यांनी आपली प्रवासी रिक्षा कल्याण नेरळ रस्त्याच्या कडेला उभी केली. प्रवासी रिक्षामध्ये बसण्यासाठी येत असताना नेरळ गावाकडून बदलापूर कडे जाणाऱ्या इको कारने आधी त्या महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या मुलांना धडक दिली. नंतर पाठीमागून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला देखील धडक दिली. रिक्षामध्ये दामत येथून प्रवास करणारे बाबू भाईजी यांच्या डोक्याला, कमरेला तसेच रिक्षा चालक नदीम नजे आणि महिला तसेच दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जखमी प्रवासी यांना तातडीने बदलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

बदलापूर येथे उपचार घेत असताना गंभीर जखमी असलेल्या अडीच वर्षाच्या लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर जखमी मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी बदलापूर येथून मुंबई येथे नेण्यात आले आहे. मुंबई बांद्रा येथील त्या कुटुंबाचा सौशल्या इमारतीत सदनिका असून सुट्टी साठी नेरळ ममदापूर येथे आले होते. मुंबई येथे परत जाण्यासाठी ते निघाले होते. या अपघातास कारणीभूत असलेले इको कार चालक याच्यावर नेरळ पोलीस ठाणे येथे अपघात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. हवालदार राहुल गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version