घाटरस्ता 15 ऑगस्टपर्यंत बंद
| पोलादपूर | शैलेश पालकर |
पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सुरूर रस्त्यावरील आंबेनळी घाटामध्ये 11 जुलै रोजी सुरू झालेली घाटरस्ताबंदीची अधिसूचना घाट सुरू होण्यापूर्वीच 15 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत वाढली आहे. या नवीन अधिसूचनेमध्ये अवजड वाहनांपुरती बंदी ठेवून एलएमव्हेईकल आणि कार तसेच तत्सम कमी वजनाच्या वाहतुकीला अनुकूलता दर्शविण्यात आली असली तरी आंबेनळी घाटरस्ता दुरूस्तीऐवजी बंदीसाठीचे प्रयत्न वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, बंदी कालावधीमध्ये भरावाच्या बहाण्याने हेजार्डस केमिकल वेस्ट लालमातीखाली गाडून आंबेनळी घाटाचे रूंदीकरण करण्यात येणार असल्याची कुजबूज सुरू आहे.
पोलादपूर महाबळेश्वर ते वाई सुरूर रस्ता महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या ताब्यात गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोलादपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत क्षेत्रात असलेल्या महाबळेश्वर-वाई ते सुरूर रस्त्याच्या आंबेनळी घाटातील रूंदीकरणास सुरूवात झालेल्या रस्त्यापैकी पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील साधारणत: 24.200कि.मी.रस्ता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीमध्ये असताना आंबेनळी घाटातील ब्रिटीशकालीन पुलांना दोन्ही बाजुंनी काँक्रीटचे जॅकेट बांधून पुल टिकविण्याचा प्रयत्न झाला, दरीच्या बाजूने रुंदीकरण करण्यासाठी डोंगर उभे कापून मातीचा भराव करण्यात आला, मोठमोठी झाडे आणि अनेक वर्षांपासूनची झाडे तोडण्यात आली. देखभाल दुरूस्ती तसेच संरक्षक कठडे आणि डोंगरउताराच्या बाजूने रूंदीकरण, डांबरीकरण तसेच साईडपट्टयांचे मजबूतीकरण आदी कामे सातत्याने सुरू राहिली. 21 जुलै 2021च्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाट अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाताहत झाल्यानंतर या रस्त्याच्या कायमस्वरूपी मजबूतीकरणासाठी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या ताब्यात हा संपूर्ण आंबेनळी घाटरस्ता सोपविण्यात येऊन सातारा बाजूने या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर शहर, कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायती अंतर्गत रानबाजिरे, काटेवाडी, सिध्दार्थनगर,भराववाडी, कापडे कमानीचा परिसर तसेच आड, चांभारगणी, कुंभळवणे, पायटे, दाभिळटोंकपर्यंतच्या या 24.200कि.मी.रस्त्याचे रूंदीकरण होण्याची शक्यता दिसून येत आहे. याबाबत महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनमार्फत कोणताही दुजोरा देण्यात आला नसला तरी आजमितीस रस्त्याची मोजणी व अन्य कामांना सुरू झाली आहे.
पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याच्या सुधारणेचे काम कंत्राटदार आरपीपी-एसआयपीएल (4) यांच्यामार्फत हाती घेण्यात आले असून सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून जात असून, पायटा गावापासुन महाबळेश्वरकडे जाताना 1 कि.मी. अंतरावर दरडप्रवण क्षेत्रात गुरूवारी दि.10 जुलै रोजी जोराचा पाऊस पडल्यामुळे डोंगरावरील दगड गोठे व माती रस्त्यावर आली. याठिकाणचे माती व दगड गोटे जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचे काम कंत्राटदारांमार्फत प्राधान्याने चालू आहे. या दरडप्रवण क्षेत्रामध्ये अजून माती व दगड येण्याची शक्यता असून, ते काढण्यास 4 ते 5 दिवस लागणार असल्याने पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी महाबळेश्वर तहसीलदार सचिन मस्के यांना दूरध्वनीद्वारे वाहतुकीसाठी महाबळेश्वर ते पोलादपूर रस्ता बंद ठेवण्याची सूचना केली आणि यादरम्यान गुरुवारी दुपारनंतर पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे आणि तहसिलदार घोरपडे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत दरडप्रवण क्षेत्रामध्ये वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहनचालकांना मार्गदर्शन केले.
मात्र, 14 जुलै रोजी आंबेनळी घाटातील वाहतुक सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असताना अचानक सोमवार दि. 15 जुलै 2025 रोजी पुन्हा अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटामध्ये 5-6 ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या स्वाक्षरीनिशी पुन्हा नवीन अधिसूचना काढण्यात येऊन अवजड वाहनांना घाटरस्त्यावरून वाहतुकीस बंदी कायम ठेवून छोटया वाहनांसाठी अतिदक्षतेसह वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे. याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयालगत महाबळेश्वर रस्त्यावर बॅरिकेटस् लावून मोठ्या वाहनांना आंबेनळी घाटातून प्रतिबंध असल्याचे दर्शविले आहे.
प्रशासनाला गांभीर्य नाही
पावसाला सुरूवात झाल्यानंतर पर्यावरण दिवशीच आंबेनळी घाटातील कुंभळवणे गावातील दरीभागात केमिकल वेस्ट आणि रासायनिक घनकचऱ्यासह रिॲक्टर ॲशची पोती टाकण्यात आल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने याबाबत कोणतीही भूमिका गांभिर्याने घेतली नव्हती. यामुळे आंबेनळी घाटरस्ता दुरूस्तीच्या बहाण्याने अवजड वाहनांतून अशाच प्रकारची हेजार्डस केमिकल वेस्ट वाहून नेऊन त्यावर जेसीबीने मातीचे ढिगारे टाकून गाडण्यात येत भराव केला जाण्याची साशंकता व्यक्त होत आहे. यामुळेच दरडप्रवण असल्याच्या वस्तुस्थितीसोबत रूंदीकरण करण्याच्या बहाण्याने सध्या छोट्या व हलक्या वाहनांसाठी सुरू असलेला आंबेनळी घाटरस्ता लवकरच काही काळ सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.







