विधानसभा अध्यक्षांची निवड पुढील वर्षी

राज्यपालांच्या पत्रानंतर निर्णय
मुंबई | प्रतिनिधी |
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढील वर्षी मार्चमध्ये होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात पडद्यामागूनही अनेक घडामोडी घडत असल्याचं बोललं जात होतं. मात्र, मंगळवारी राज्यपालांनी राज्य सरकारला पत्राद्वारे उत्तर दिलं आणि सगळी सूत्र फिरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यंदाच्या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी 28 डिसेंबर अर्थात मंगळवारचा दिवस देखील नक्की करण्यात आला होता. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून राज्य सरकारने निवडणूक घेण्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव देखील सोमवारी राज्यपालांना पाठवला होता. मात्र, त्यावर राज्यपालांची मंजुरी मिळालेली नव्हती. त्यामुळे नेमकी निवडणूक होणार की नाही? याविषयी चर्चा सुरू झाली होती. राज्य सरकारला राज्यपालांच्या उत्तराची प्रतिक्षा असताना अखेर दुपारी राज्यपालांनी पत्राद्वारे राज्य सरकारला उत्तर पाठवलं आहे.
राज्यपालांनी आपल्या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा समावेश केला, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नसली, तरी बंद लिफाफ्यामध्ये राज्य सरकारला पाठवलेल्या या पत्रामध्ये राज्यपालांनी या निवडणुकीसाठी नकारात्मकच प्रतिसाद दिल्याचं सांगितलं जात आहे. या पाश्‍वर्र्भूमीवर हालचाली सुरू झाल्या आणि ही निवडणूक थेट पुढच्या वर्षी होणार असल्याचं समोर आलं आहे.

निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात
यादरम्यान, राज्यपालांनी पत्र पाठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देखील या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनी फोनवर चर्चा केली असून यामध्ये राज्यपालांच्या परवानगीशिवाय निवडणुका घेतल्यास निर्माण होई शकणार्‍या कायदेशीर पेचप्रसंगाविषयी देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर अखेर ही निवडणूक पुढील वर्षी मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण
विधिमंडळाच्या अधिवेशनात कोरोनाने शिरकाव केला असून आज राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड ऐन अधिवेशनात कोरोनाग्रस्त झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. तर आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे,भाजपचे विधान परिषद सदस्य समीर मेघे कोरोनाने बाधित झाले तर 32 कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहे .

Exit mobile version