जनतेत संतापाची लाट
| उरण | वार्ताहर |
उरण पूर्व विभागातील सुमारे 17 गावांना सुरळीत विद्युतपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून नव्याने विद्युत जोडण्याचे काम भेंडखळ ग्रामपंचायत ते खोपटा पुल या दरम्यान मंजूर करण्यात आले आहे. मात्र, सदर कामाचा ठेका घेणार्या ठेकेदाराने काम अर्धवट टाकून पळ काढल्याने सदरचे काम हे मागील काही दिवसांपासून रखडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उरण पूर्व विभागातील खोपटा, कोप्रोली, पिरकोन, आवरे, सारडे, वशेणी, पुनाडे, मोठी जुई, कळंबुसरे, चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील गावांना तसेच व्यावसायिक, गोदामांना महावितरणच्या माध्यमातून विद्युतपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील खाडीतून येणारी विद्युतवाहक केबल सातत्याने तुटत असल्याने तसेच पावसाळ्यात त्यामध्ये बिघाड होत असल्याने महावितरणच्या कर्मचार्यांना विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना हा आपला जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे.त्यामुळे रात्री-अपरात्री सातत्याने विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा नाहक त्रास हा रहिवाशांबरोबर व्यावसायिकांना सहन करावा लागत असल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व मनसेचे तालुकाध्यक्ष अॅड. सत्यवान भगत यांनी यासंदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार करून नव्याने सुरळीत विद्युत जोडणीचे काम करण्याची मागणी केली.
या कामाचा ठेका घेणार्या ठेकेदाराने महावितरण कंपनीच्या देखरेखीखाली विद्युत जोडण्याचे काम सुरूही केले होते. मात्र, करोडोंचा ठेका घेणार्या ठेकेदाराने भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील कोस्टल रोड रोडवरच विद्युत जोडण्याचे काम अर्धवट टाकून पळ काढल्याने सदरचे काम हे मागील काही दिवसांपासून रखडल्याचे चित्र दिसून येत आहे. तरी सदरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.
उरण पूर्व विभागात सुरळीत विद्युतपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून नव्याने विद्युत जोडण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. सध्या सदरचे काम करणारा ठेकेदार पळून गेल्याची बाब समोर येत आहे. तरी नव्या ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतर अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यात येणार आहे.
– जयदीप नानोटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता,
महावितरण उरण