विजेवर चालणार्या गाड्यांसाठी सज्ज
443 कि.मी. विद्युतीकरणाचे काम पूर्ण
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर कारवार-मडगाव सीआरएस चाचणी करण्यात आली असून या मार्गाचे विद्युतीकरणाच्या प्रवासात आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. कोकण रेल्वे मार्गावर कारवार ते मडगावदरम्यान 72 कि.मी.च्या सेक्शनमध्ये झालेल्या विद्युतीकरणाच्या कामाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी तपासणी केली. हा मार्ग आता विजेवर धावणार्या रेल्वे गाड्यांसाठी सज्ज झाला आहे. रोहा ते रत्नागिरी पाठोपाठ आणखी एक टप्पा विजेवर चालणार्या गाड्यांसाठी सज्ज झाला आहे.
कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चारशे कि.मी. मार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे. त्यातील रोहा ते रत्नागिरी या 42 कि.मी.चे काम पूर्ण झाले असून एक पॅसेंजर विजेवर धावू लागली आहे. त्या पुढील रत्नागिरी ते मडगांव या टप्प्याचे काम ही वेगाने चालू आहे. या मार्गावरील पहिली चाचणी केली गेली असून उर्वरित दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या मार्गावरील तिसर्या टप्प्याचे म्हणजेच मडगांव-थिवी दरम्यान सीएसआर चाचणी घेतली जाणार आहे. मध्य सर्कलचे रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी या कामाची तपासणी केली.
अकराशे कोटी रुपयांचा खर्च
लवकरच रत्नागिरी ते थिवी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर कोकण रेल्वेचा पूर्ण मार्ग विजेवर धावणार्या गाड्या चालविण्यासाठी खुला होणार आहे. या विद्युतीकृत मार्गांवर सुरुवातीला मालगाड्या चालवल्या जातील आणि त्यानंतर पुढे पॅसेंजर चालवण्यात येतील. या कामासाठी अकराशे कोटी रुपयांचा खर्च कोकण रेल्वे मार्गावर केला जाणार आहे. संपूर्ण मार्गावरील काम येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
443 कि.मी. चे काम पूर्ण
रेल्वे मंत्रालयाने 2016 मध्ये संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी मंजुरी दिली होती. एकूण 741 कि.मी. अंतरांपैकी 443 कि.मी. अंतराचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रोहा ते रत्नागिरी 204 कि.मी. आणि कारवार ते ठोकूर 239 कि.मी. अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या कामासाठी एकूण 1 हजार 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.