1100 हेक्टर जमीन ओलीताखाली येणार, 97 कोटी रुपयांची तरतूद
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणी टंचाईचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी आणि या भागातील 1100 हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्यासाठी पाली- भूतीवली हा लघुपाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आले आहे. त्या धरणात गेली 19 वर्षे पाणी पडून आहे, मात्र धरणाचे पाणी कालव्यात सोडण्यासाठी कालवे बांधले नव्हते. त्यामुळे एवढी वर्षे भातशेतीला पाणी मिळाले नव्हते. परंतु राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून उजवा,डावा आणि मुख्य कालवा बांधण्यासाठी 97 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान,अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कालवे बांधले जाणार असल्याने 2023 मध्ये पाली भूतीवली धरणाच्या पाण्यामुळे जमीन ओलिताखाली येणार आहे.
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि तेथील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे पाणी शेती साठी कधी मिळणार असा प्रश्न या भागातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्यासाठी बांधले जाणारे कालवे यांची कामे अद्याप पूर्ण होण्याची नाव घेत नाहीत.पाटबंधारे खात्याच्या उदासीन कारभारामुळे धरणात साठून राहिलेले पाणी शेतीसाठी दिले जात नाही.कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी पाली भूतीवली लघुपाटबंधारे प्रकल्पाची निर्मिती शासनाने केली आहे.शासनाचा हा उद्देश पाली भूतीवली धरणात यशस्वी झालेला दिसत नाही.कारण धरणाच्या जलाशयात 2004 पासून पावसाचे पाणी साठून राहत असून पाटबंधारे विभागाने शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी कालवे बांधले नसल्याने शेती केली जात नाही.
पाटबंधारे खात्याला एवढ्या वर्षात कालवे बांधण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करता आले नाही. त्यामुळे मुख्य कालवा आणि उजवा तसेच डावा असे 15 किलोमीटर लांबीचे कालवे बांधून पूर्ण झाले नाहीत.धरणाचा मुख्य बांध पूर्ण झाल्यानंतर कालव्यांचे काम सुरु करताना वन विभागाने अडथळा आणा आणि तेंव्हापासून कालव्यांची कामे पुढे सरकली नाहीत.धरणाचे पाणी या भागातील 20 गावातील शेतीसाठी सोडले जाणार आहे,त्यासाठी एक किलोमीटर लांबीचा मुख्य कालवा आणि सोबत पाच किलोमीटर लांबीचा डावा कालवा तसेच नऊ किलोमीटर लांबीचा उजवा कालवा बंधने आवश्यक होते. आता केवळ मुख्य कालव्याचे काही बांधकाम वगळता कुठेही कालवे खोडता आले नव्हते,त्यासाठी आता राज्य सरकारने तब्बल 97 कोटी रुपयांचे मोठे पॅकेज पाली भूतीवली धरणासाठी मंजूर झाले आहेत.पाटबंधारे खात्याने पाली भूतीवली धरणाच्या 15 किलोमीटर लांबीच्या कालव्यांची बांधकामे करण्यासाठी कालवे खोदण्याचे काम करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे धरणाचे पाणी शेतीसाठी येणार म्हणून गेली 30 वर्षे वाट पाहणारे आसल, भूतीवली, आसलपाडा, बेकरे, माणगाव, आंबिवली, कुंभे, एकसल, भानसोली, उकरूल, चिंचवली, बार्डी, डिकसळ, गारपोली, उमरोली, कोषाने, आषाणे, सावरगाव, वांजळे, वावे या गावातील शेतजमीन ओलिताखाली येणार आहे.
पुढील दोन वर्षात कालव्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने दिले आहे. त्यानुसार कामाचे नियोजन करून कालवे खोदून बांधण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. -पी डी जाधव, उपअभियंता लघु पाटबंधारे विभाग