| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यात वारंवार वीज खंडित होण्याची समस्या जटिल झाली आहे. एकीकडे कडक उन्हामुळे घामाच्या धारा अन दुसरीकडे विजेचा खेळखंडोबा यामुळे नागरिकामध्ये प्रचंड असंतोष आहे. आदई गावामध्ये देखील मागील काही दिवसांपासून भरदिवसा विजेचा लपंडाव होत असून रात्री अपरात्री देखील वीज खंडित होत आहे. त्यामुळे विजेच्या या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
या समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पनवेलमार्फत विद्युत महामंडळाची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. पावसाळ्यामध्ये विद्युतवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित होणे समजू शकतो परंतु कडक उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार वीज जाण्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच या महिन्यात ऊनाचा कडाका मोठ्या प्रमाणात असून उष्माघातामुळे नुकतेच काही जणांचे बळी देखील गेले आहेत. या अनुषंगाने सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष सुजीत सोनावणे यांनी विद्युत महामंडळाच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच यावेळी वीज खंडित होण्याची नेमकी कारणे काय आहेत, याची पूर्ण खबरदारी बाळगून विद्युत महामंडळाने वीजपुरवठा सुरळीत करावा आणि उन्हाळा संपेपर्यंत वीज खंडित होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. सदर समस्येबाबत योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी पनवेल विद्युत महामंडळाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी दिले.