| अलिबाग | प्रमोद जाधव |
महावितरणच्या वाढत्या विज बिलामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. मात्र विजेच्या वाढत्या दरावर पर्यायी मार्ग आता रायगडकारांना मिळाला आहे. जिल्ह्यात सौर उर्जा निर्मितीवर भर दिला जात असून 263 लाभार्थ्यांनी नुतनीकरणक्षम उर्जा निर्मितीप्रणालीचा लाभ घेतला आहे. त्यामुळे वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.
वीज निर्मितीसाठी कोळसा जळत असल्याने प्रदुषणाचा धोका अधिक आहे. त्यात वीजेचे दर गगनाला भिडू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक ताळमेळ बिघडू लागला आहे. वीजेचा वापर 300 युनिटच्यावर गेल्यावर पर युनिट 12 ते 15 रुपयांनी वाढ होते. त्यामुळे भरमसाठ बील ग्राहकांना महावितरणकडून मिळत असल्याची ओरड दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वीज बिलामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. आता मात्र वाढत्या वीज बिलावर नियंत्रण ठेवण्यासाठी सौर उर्जा निर्मितीवर भर देण्यास रायगड जिल्हयातील नागरिकांनी सुुरूवात केली आहे. नुतनीकरणक्षम उर्जा निर्मिती प्रणालीद्वारे गावागावात शहराच्या ठिकाणी सरकारी कार्यालयांमध्ये सौर उर्जा निर्मितीवरील प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. सुर्य प्रकाशावर तयार होणाऱ्या विजेमुळे कार्बन उत्सर्जन प्रमाण कमी होणे. महावितरणला विजेसाठी लागणाऱ्या कोळश्याचा वापर कमी होणे. भरमसाठी होणाऱ्या वीज बिलावर नियंत्रण राहून बील कमी येणे असे पर्यायी मार्ग उपलब्ध झाले आहेत. अलिबाग व पेण तालुक्यातील 263 ठिकाणी सौर उर्जा निर्मिती करणारे सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. सोलर पॅनलला मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
सौर उर्जा निर्मितीचे फायदे
वीज बिलाची बचत होण्यासाठी सोलर पॅनल महत्वाचे ठरत आहे. महावितरण कंपनीचे वीज मीटर व सौर उर्जेचे मीटर त्याठिकाणी बसविले जाते. सुर्यापासून निर्माण होणारी वीज निर्मिती मीटरमध्ये साठवणूक होते. वीज निर्मिती महावितरणला मिळते. त्यामुळे विजेचा नैसर्गिक स्त्रोत प्राप्त होतो. त्याचा परिणाम कोळश्याऐवजी सुर्य किरणाच्या मदतीने विज निर्मिती करण्यास मदत होते.सुर्य प्रकाशावर तयार होणाऱ्या वीजेमुळे विज बील कमी येते.