मक्तेदारी, हुकूमशाहीला संपवा: चित्रलेखा पाटील

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

तालुक्यात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. शेतकरी कामगार पक्षामार्फत जनतेच्या हितासाठी अनेक आंदोलने केली आहेत. स्मार्ट मीटरसह खड्डेमय रस्त्याविरोधात आपण रस्त्यावर उतरून आवाज उठविला आहे. गोरगरीबांचा आवाज बनायचे असेल, तर फक्त शेकापचा लाल बावटा घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल. तालुक्यात सुरु असलेली मक्तेदारी, हुकुमशाही रोखण्यासाठी कामाला लागले पाहिजे. स्थानिकांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आहे. आपला माणूस सत्ता केंद्रात राहिला पाहिजे. त्यासाठी मक्तेदारी आणि हुकूमशाही संपवा, असे आवाहन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.

कावीर जिल्हा परिषद मतदार संघातील शेकापचे उमेदवार मोहन धुमाळ, रामराज पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार अंजली पाटील यांच्या प्रचारार्थ बोरघर येथे शनिवारी (दि.31) सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. यावेळी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, मोहन धुमाळ हे देवदूत रुपी माणूस आहेत. माणुसकी जपणारे व्यक्ती आहेत. जनतेच्या मागणीनुसार त्यांना उमेदवारी दिली. जनतेच्या विश्वासावर त्यांना उभे केले आहे. शेकाप कार्यकर्त्यांसह काँग्रेस, शिवसैनिकदेखील त्याच्या पाठीशी ठाम उभे आहेत, त्याचा आनंद आहे. या निवडणूकीत मोहन धुमाळ यांच्यासह अंजली पाटील यांना भरघोस मतांनी जनता निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला. जे एका पक्षाशी प्रामाणिक राहिले नाहीत. ते जनतेशी प्रामाणिक काय राहणार अशी घाणाघाती टीका चित्रलेखा पाटील यांनी केली. ज्यांची वृत्ती फसवी असते. ती सर्वस्तरातून फसवेगिरी करणारी असते. जनतेलादेखील फसवणारा तो व्यक्ती असतो. त्यामुळे या निवडणूकीत फसवेगिरी करणाऱ्यांना घरी बसवा असे आवाहन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.

शेतकरी कामगार पक्ष लहान आहे. परंतु, चौथी पिढी पक्षाचे काम करीत आहे. अनेकजण आमिष दाखवितात.परंतु, या अमिषाला बळी न पडता, सर्वसामान्यांसाठी लढणारा पक्ष म्हणून शेकापची एक वेगळी ओळख आहे. पुढचा काळ हा आपला आहे. या सीटकडे जनता एक वेगळ्या अपेक्षेने बघत आहे. खटारा अंतरात येण्यासाठी ही बैठक घेतली आहे. घरोघरी जाऊन काम करा. विभागाला मोहन धुमाळ सारखा माणूस का गरजेचे आहे हे दाखवून द्या. विरोधकांकडून पैशाचा पाऊस येणार आहे. एकनिष्ठ व प्रामाणिक उमेदवारालाच जनता निवडून देईल. या तालुक्यात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. गोरगरीबांचा आवाज बनायचे असेल, तर फक्त शेकापचा लाल बावटा घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल. अन्यथा ही मक्तेदारी, हुकुमशाही रोखण्यासाठी कामाला लागले आहे. विकासाला विरोध नाही, परंतु हा विकास स्थानिकांचा झाला पाहिजे ही भूमिका आहे. आपला माणूस सत्ता केंद्रात राहिला पाहिजे. शेकापने अनेक लढे लढले आहेत. स्मार्ट मीटरसह खड्डेमय रस्त्याविरोधात आपण रस्त्यावर उतरून आवाज उठविला आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version