अलिबागमध्ये होणार महापुरुषांच्या विचारांचा जागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा पुढाकार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधनाचे काम केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून महापुरुषांचे विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी अलिबागमध्ये महापुरुषांच्या विचारांचा जागर रविवार दि.17 मे रोजी होणार आहे. स्मारक समितीच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत होणार आहे. वेगवेगळ्या वक्त्यांच्या मार्गदर्शनासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संगीतमय नाट्य सादर केले जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी दिली. महापुरुष तसेच महामातांचा जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये गुरुवारी (दि.14) ते म्हणाले.

यावेळी समितीचे उपाध्यक्ष संतोष जाधव, सचिव उत्तम रसाळ, सहसचिव विजय गायकवाड, खजिनदार प्रदीप ओव्हाळ, अंजली गायकवाड, सविता ओव्हाळ, प्रफुल कानिटकर, मंगेश कानिटकर, नितीन गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, धरमदास डवले, पांडुरंग कदम, संतोष शिंदे, ॲड. विशाल जाधव, जयप्रकाश पवार, मिलिंद जाधव, प्रा. डॉ. पी.बी. आचार्य आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी (दि.17) सकाळपासून संध्याकाळपर्यंत होणारा कार्यक्रम दोन सत्रामध्ये होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर नारायण गायकवाड गुरुजी (सामाजिक क्षेत्र), नितीन राऊत (अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्र), ॲड. प्रसाद पाटील साहेब (शैक्षणिक क्षेत्र) सचिन कांबळे (कला व सांस्कृतिक क्षेत्र) गोपाळ कांबळे (पत्रकारिता क्षेत्र) आणि डॉ. राजेंद्र चांदोरकर (वैद्यकीय क्षेत्र) या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान समितीच्या वतीने केले जाणार आहे. त्यानंतर होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असारोंडकर, प्रा. डॉ. जयेश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन या निमित्ताने लाभणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये दुपारनंतर प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक सचिन कांबळे आपल्या टीमबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संगीतमय नाट्य सादर करणार आहेत. कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने केले जाणार आहे. थोर महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्याबरोबरच घराघरात ते विचार रुजविण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती संजय गायकवाड, उत्तम रसाळ आणि प्रा. डॉ. पी. बी. आचार्य यांनी दिली. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले.

Exit mobile version