कांदळवनांची पर्यावरण संरक्षणासाठी मदत

| तळा | प्रतिनिधी |

तळा तालुक्यातील खाडी किनारी भागात कांदळवनांमुळे अनेक प्रकारे पर्यावरण संरक्षणासाठी मदत होत असते. या कांदळवनांचे संवर्धन करून अधिकची लागवड वनविभागाने हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.

तळा तालुक्यातील राजापुरी खाडीचा रहाटाड हा एक महत्वाचा जैविक परिसर आहे. येथील खाजण वन हे अनेक सागरी जीवांचे आधार आहेत. त्यापासून खाडी किनारी असणाऱ्या शेतीलाही फायदा होत असून भरतीचे खाऱ्या पाण्यापासून संरक्षण होण्यास मदत होत असते. तसेच, मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाले की, या खाजण क्षेत्रातील कुजलेल्या पानांवर जाळीसारख्या पसरलेल्या मुळांमध्ये विविध प्रकारचे मासे, कोळंबी, खेकडे, शंख, बोईट, जिताडा इत्यादी माशांचे प्रकार प्रजाननाच्या वेळी जून-जुलै महिन्यात येत असतात. त्या ठिकाणी त्यांचे संवर्धन व संरक्षण चांगल्या प्रकारे होत असते. 2013 पूर्वी स्थानिक नागरीक या भागातील वृक्षांची तोड करून सरपणासाठी लाकडे वापरत असत. त्यामुळे ही कांदळवने नष्ट होण्याच्या मार्गावर आली होती. त्यामुळे सागरी जीवांना प्रजननाच्या कालावधीत सुरक्षितेच्या दृष्टीने या सागरी जीवांवरती संकट ओढवल्याचे चित्र पहावयास मिळत होते. सन 2014-15 या वर्षात वनविभागामार्फत रहाटाड येथील दुर्लक्षित कांदळवनांच्या भागात लक्ष घालून माणगाव वन परिक्षेत्रातील तळा तालुक्यातील रहाटाड येथील खाजण क्षेत्रात इंबी, चिपी, खारफुटी, तीवर इत्यादी प्रकारच्या रोपांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. त्याचबरोबर पूर्वीचीही वृक्ष होती. आज हा क्षेत्र हिरवागार दिसत असून वृक्षांची चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे.

Exit mobile version