शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याची अपेक्षा
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील महत्वाच्या राज्यमार्ग रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यातील कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गवरील सुगवे फाटा येथून नेरळकडे येणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी या रस्त्याचे काम अडवले असून अनेक ठिकाणी हा रस्ता अंत्यंत संथ गतीने पुढे सरकत आहे.
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गवरील सुगवे गावापासून नेरळकडे येणारा पिंपळोली तळवडे रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गतवर्षी याच रस्त्यावरील आंत्रट गावापासून गुडवणकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता. आता तोच रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी खोदण्यात येत आहे. या रस्त्यावर सुगवे भागाकडून तसेच नेरळ भागातील तळवडे भागाकडून रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. रस्त्याचे रुंदीकरण करून साडे पाच मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यात हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनवून वाहनचालक यांना दिलासा देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. मात्र रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी सध्याच्या वापरात असलेल्या रस्त्याचा आजुबाजूला आणखी जमीन लागणार आहे. मात्र ती जमीन मिळविण्यात अडथळे येत आहेत. अतिरिक्त जमीन देण्यास कोणीही तयार नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यासाठी लागणारी वाढीव जमीन मिळत नाही. त्याचा परिणाम रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यात रस्त्यासाठी अनेक ठिकाणी जुने रस्ता खोदण्यात आला आहे आणि त्यामुळे सध्याच्या रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण होऊन बसले आहे. अनेक ठिकाणी तयार झालेले खड्डे यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड गोळा झालेले आहेत. जुने डांबरी रस्ता खोदल्याने आताचा वाहतुकीस वापरत असलेला रस्ता हा मातीचा बनला आहे. त्यामुळे वाहनचालक तसेच स्थानिक रहिवाशी यांना धुळीच्या रस्त्याने जावे लागत आहे.
अपघात होण्याची शक्यता
दुसरीकडे रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून रस्त्याच्या कामामुळे वाहनचालक यांची गैरसोय सुरू आहे. त्यात रस्ता खोदून ठेवल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक निर्माण झाल्या आहेत. बांधकाम विभागाने यातून मार्ग काढावा आणि रस्ता वाहतुकीस सुस्थितीत येईल असा तयार करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तळवडेपासून पुढे पिंपळोली तसेच काळेवाडी आंत्रट गुडवण आणि सुगवे या भागातील वाहनचालक यांना मातीच्या रस्त्याने जावे लागत असल्याने धुळीचा त्रास प्रामुख्याने दुचाकीचालक यांना सहन करावा लागत आहे.







