| तळा | वार्ताहर |
सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस कधीही पडू शकतो, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. पावसाची धास्ती असली तरी देवदिवाळीच्या पूर्वी भातमळणी आटोपण्यासाठी पावसाचे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. शिवाय मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे शेतकरी कुटुंबे पहाटेच शिवारात दाखल होत असल्याचे चित्र दिसत आहे.
देवदिवाळी म्हणजे भातमळणी पूर्ण करून आलेला मोठा सण. या आधी भातमळणी पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचा आटापिटा चालू असतो. अशा परिस्थितीत या वर्षी ढगाळ व पावसाचे प्रमाण वाढले आहे. मळणी झालीच पाहिजे, या आवेशाने शेतकरी सकाळी लवकरच या कामाला लागत आहेत. सकाळी 10 ते 11दरम्यान भाकरी व दुपारच्या जेवणाआधी भात झोडपून पूर्ण झाले पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. त्यानंतर पेंढा वाहून नेणे, भात हरपणे, बाकी गुतकाडी आटोपाला लावणे, पोल पाखडणे अशी कितीतरी कामे सायंकाळच्या वेळेत करावी लागतात.
पाऊस व ढगाळ वातावरण असले तरी मळणी करावीच लागणार आहे. सकाळी लवकर कामाला लागल्यामुळे भातमळणी दुपारी पूर्ण होते. पावसापूर्वी धान्य घरी आणण्यासाठी सर्वच जण जीव तोडून कामे करत असतात.
नितेश झावरे, तरुण शेतकरी
मळणी यंत्रे न वापरता लोखंडी बॅरेलवर भात झोडली जातात. त्यामुळे भात निखळ, चोख निघते. त्याचबरोबर पेंढा चांगला रहातो. गुताडा कमी पडतो. त्यामुळे कमी वेळात भात साफ होतो. या बॅरेलवर महिलांना भात झोडणी करताना जास्त कष्ट करावे लागत नाहीत.
प्रमिला धनावडे, महिला शेतकरी
