डॉ. राज कल्याणी यांचे मत
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुका सह्याद्रीच्या पर्वत रांगेत कुशीत वसलेला एक सुंदर रमणीय, नैसर्गिक वरदहस्त लाभलेला, पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. परंतु, सुविधांअभावी पर्यटक याठिकाणी जास्त दिवस थांबत नाही. याठिकाणचे एक दोन पर्यटन क्षेत्र बघतात आणि निघुन जातात. तरी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पर्यटन विकासासाठी उत्तम पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे, असे मत डॉ. राज कल्याणी यांनी केले.
मुरूड शहर नारळ, सुपारी झाडाने वेढलेली आहे. ही झाडे पर्यटकांना आकर्षित करत असतात. रिकाम्या परिसरात पडीक झालेल्या झावळ्यापासून चांगलं आकर्षित खोली बनवली तर नक्कीच पर्यटक या ठिकाणी आकर्षित होईल आणि याठिकाणी रोजगार वाढेल. मुरूड पर्यटन क्षेत्रात, शहराजवळील टेकडीवर ऐतिहासिक श्री दत्त मंदिर, ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ला, ऐतिहासिक जंजिरा किल्ला, खोकरी, खोरा बंदर, गारंबी, सवतकडा धबधबा, अंबोली धरण, राजवाडा, शहरातील सुंदर निळसर समुद्रकिनारा, जगप्रसिद्ध काशिद समुद्रकिनारा, इदगा असे विविध पर्यटन क्षेत्र असून पर्यटकांना माहिती देण्यासाठी गाईड्सची उपलब्धता नाही. दर्जेदार रस्ते, स्वच्छतागृहे ,सुलभ पर्यटनासाठी हाय-स्पीड इंटरनेट, पिण्याचे पाणी, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आणि डिजिटल पेमेंट, पर्यटन स्थळांवर सुरक्षेची हमी, हॉटेल्स, स्वच्छता, आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यांसारख्या सुविधांचे नियोजन आणि निर्मिती, स्थानिक रोजगार निर्मितीसह पर्यटन स्थळांना जागतिक स्तरावर आकर्षित करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तरच पर्यटक या ठिकाणी जास्तीत जास्त दिवस थांबतील. या सुविधांच्या नियोजनबद्ध मांडणी केली तर पर्यटकांना आकर्षित करण्यात मदत होईल. त्यातूनच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून शाश्वत विकासाला मोठी मदत होईल, असे मत डॉ. राज कल्याणी यांनी केले.
