शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नीट पेपरफुटीमुळे राजधानीतील वातावरण तापले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पेपरफुटी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी विद्यार्थ्यांवर लाठ्या चालविल्या जात आहेत. देशाच्या भविष्याला न्याय मागितल्याची शिक्षा दिली जात असेल, तर हा लोकशाहीचा नव्हे तर दडपशाहीचा मार्ग आहे. सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. चलो संसद आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असेही त्या म्हणाल्या.
दिल्लीतील जंतरमंतरवर ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांच्यासह विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते अनेक दिवस उपोषण करत होते. त्यांची दखल घेण्याऐवजी त्यांना रुग्णालयात नेलं गेलं. हे लोकशाहीचं नव्हे, तर लोकशाहीच्या हत्येचं चित्र आहे. पेपरफुटी ही सरकारची चूक आहे. विद्यार्थ्यांची मागणी एवढीच होती की, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. पण सरकारचा अहंकार इतका वाढला आहे की, संवाद साधण्याऐवजी विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवल्या जात आहेत.
अभिजीत दिपके आणि आंदोलनकर्त्यांनी वारंवार शांततापूर्ण आंदोलनाची भूमिका घेतली. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेत आंदोलन सुरू होते. मग अशा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? असा संतप्त सवालही चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला.
हे आंदोलन सरकारमुळेच चिघळले
आंदोलन उग्र होण्यास सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत चित्रलेखा पाटील म्हणाल्या कि, विद्यार्थ्यांशी वेळेत संवाद साधला असता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असते, तर परिस्थिती एवढी बिघडली नसती. पेपरफुटी हे सरकारचे अपयश आहे. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात, क्लासेस लावतात, लाखो रुपये खर्च करतात; पण त्यांच्याच भविष्याशी खेळ झाला.
लोकशाहीत आंदोलन होणारच, नागरिक प्रश्न विचारणारच, सरकारला प्रश्न विचारला म्हणून कोणी देशद्रोही ठरत नाही. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बळाचा वापर करणे अत्यंत दुर्दैवी आहे,असेही त्या म्हणाल्या.
शेकाप विद्यार्थ्यांच्या पाठीशी
या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटतील, असा विश्वास व्यक्त करत चित्रलेखा पाटील म्हणाल्या, अभिजीत दिपके हा महाराष्ट्राच्या मातीतला मुलगा आहे. शाहू, फुले, आंबेडकर आणि सावित्रीबाई यांच्या विचारांची परंपरा असलेल्या या भूमीत अन्यायाविरोधात लढण्याची परंपरा आहे. युवक हा लढा पुढे नेतील. शेकाप विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहील आणि सरकारला जाब विचारत राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.







